उदगीर : नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट आहे. प्रगतीचा रंग असणाऱ्या या धोरणाचे भवितव्य अंमलबजावणीवर अवलंबून आहे, असे मत ९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. येथील रघुकुल मंगल कार्यालयात दि.लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. माधव चांबुले होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव, संतोष सुतार उपस्थित होते. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक प्रगती झाली असली तरी शैक्षणिक गळती हा चिंतेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे अंंमलबजावणीचा अभाव आहे. शैक्षणिक बाबींवरचा खर्च वाढविण्याची गरज असून, विवेकी, विज्ञाननिष्ठ नागरिक निर्माण करणे ही गरज असून, प्रश्न विचारणारा नागरिक शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे. यासाठी शिक्षण ही मूलभूत गरज मानली पाहिजे, असेही देशमुख म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. दत्ताहारी होनराव यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. माधव कांबळे यांनी केले. गोविंद सावरगावे यांनी आभार मानले.
शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव...
दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने डिगोळ येथील संतोष काशीनाथ सुतार, भाकसखेडा येथील इयत्ता १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी इरफान पापामिंयाँ मिर्झा, ऋतुजा शत्रुघ्न कांबळे, विक्रांत शिवाजी वाडकर, रोहित राघोबा वाघमारे आदींचा गौरव करण्यात आला.