गौरी-गणपती व शनिवार, रविवार असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुट्टया आहेत. सण आणि सुट्ट्यांचा आनंद घेताना पाणीपुरवठ्याच्या आणि पैशाचे विघ्न आले. शहरातील एकाही एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. सणाची खरेदी करता आली नाही. तीन दिवसांपासून एटीएममध्ये खडाडाटच आहे. सोमवारीही परिस्थिती ‘जैसे थे’च होती. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड, नांदेड रोड, तसेच अंतर्गत रस्त्यावर असलेल्या अनेक एटीएममध्ये पैसेच नव्हते. अनेकजण एटीएमवर जाऊन पैसे आहेत की नाहीत याची खात्री करून घेत होते. मात्र, पैसे नसल्याने अनेकांना परत जावे लागले. गौरी-गणपतीच्या सणात ही गैरसोय झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला. बँकेत पैसे असताना ते काढता आले नाहीत. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित एटीएम यंत्रणेने एटीएममध्ये पैसे आहेत की नाहीत याची खात्री करणे आवश्यक होते, पण ती केली नाही. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे. आपल्या ५०ते ६० एटीएममध्ये सद्य:स्थितीत खडखडाट असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले.
शहरातल्या तीन जलकुंभावरून पाणीपुरवठा....
इकडे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावर सबस्टेशनमध्ये बिघाड झालेला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून ठप्प होता. रविवारी रात्री उशिरा दुरुस्ती झाली. मात्र, पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. राजधानी, बसवेश्वर, शासकीय कॉलनी येथील जलकुंभवरून सोमवारी पाणी सोडण्यात आले. उर्वरित भागांमध्ये निर्जळी होती. मांजरा प्रकल्पावरील दुरुस्तीनंतर शहरात सिग्नल कॅम्प, आदर्श कॉलनी, एलआयसी कॉलनी, दीपज्योती नगर, चौधरीनगर आदी भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला व उर्वरित भागात टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.
पाण्याचे वेळापत्रक कोलमडले....
मांजरा प्रकल्प सद्य:स्थितीत ९० टक्के भरला आहे. मुबलक पाणीसाठा झाला आहे, पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहरांमध्ये निर्जळी होती. ज्या भागात रविवारी पाणी येणार होते त्या भागात आता मंगळवारी सोडले जाणार आहे. जिथे मंगळवारी पाणीपुरवठा होणार होता तिथे शुक्रवारी पाणीपुरवठा होणार आहे. दोन दिवसांनी वेळापत्रक पुढे गेले आहे. यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणीसाठा असताना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.