नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. शहरात सोमवार रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात अराफत कॉलनीतही काही घरांत नालीचे पाणी
घुसले आहे. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे खासगी रुग्णालय आहेत. भागात रस्त्यावर गुडघाभर नालीचे पाणी साचल्याने दवाखान्यात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. शहरात झालेल्या पावसाने नालीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. येथील नाल्यांची साफसफाई दोन-तीन महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. वारंवार कल्पना देऊनही नगरपालिका कार्यालयाने दुर्लक्ष केले. याचे परिणाम मात्र सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. शहरातील अनेक भागांतील नाल्यांत कचरा जमा झाल्याने त्याचे पाणी जागेवर साचून राहते. नगरपालिका कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
अनेकांच्या घरांसमोर साचले पाणी
शहरात घरांच्या सभोवताली पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर निघण्यास अडचण होत आहे. नगरपालिकेने रस्ते व नाल्याची योग्य विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घराच्या सभोवताली पसरले आहे. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत रस्त्यावर निघावे लागते आहे. पाणी निचराअभावी संकट ओढावले आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
अतिक्रमण केल्याने स्वच्छता करता येईना...
शहरातील कराडनगर भागातील नालीवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने या भागातील नालीचे साफसफाई करता येत नाही. संबंधित दुकानदारांनी नालीवरचे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या भागात नालीचा कचारा काढण्यात येत आहे.
-त्र्यंबक कांबळे,
मुख्याधिकारी, नगरपालिका, अहमदपूर
फोटो कॅप्शन :
१ ) कराडनगर भागात आसेफ शेख यांच्या घरात नालीचे पाणी घुसल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे.
२ ) शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स भागात नालीचे पाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
३ ) शहरातील कराडनगर भागात घरांच्या समोर असे पाणी साचले आहे.