अपडेट वेळेत मिळावे
किसान ॲपच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र, त्यास उशीर होत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे वेळेत अपडेट मिळाल्यास शेतकऱ्यांना तयारी करता येते.
जिल्ह्यात या किसान ॲपबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे बाकी आहे. तुरळक शेतकरी या ॲपचा वापर करीत आहेत.
तालुकास्तरावरील कृषी कार्यालयाच्या वतीनेही शेतकऱ्यांना ॲपविषयी माहिती दिली जात आहे.
किसान ॲपवरही मिळते माहिती
सध्या बदलत्या वातावरणामुळे पाऊस, वादळी वारा असे अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविले जातात. त्याची माहिती संदेशाद्वारे शेतकऱ्यांना दिली जाते.
पीकपाणी, पिकावरील रोग, फवारणी, खतांचे नियोजन, बाजारपेठ याबद्दलचीही माहिती ॲपवरून दिली जाते.
हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानंतर तत्काळ किसान ॲपद्वारे हवामानाचा इशारा शेतकऱ्यांना कळविला जातो.
वेळेवर संदेश मिळाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार असून, खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यासाठी मदत होऊ शकते.
संदेश मिळाला, पण वादळ, अवकाळी येऊन गेल्यानंतर
जिल्ह्यात पाऊस आणि वादळी वारा होईल, असा संदेश १८ तारखेला मिळाला. मात्र, प्रत्यक्षात हवामान विभागाने १४ आणि १५ तारखेलाच जाहीर केले होते. त्यामुळे वेळेत आणि बरोबर माहिती द्यावी. - गणपतराव संपत्ते, शेतकरी
खरीप हंगामाची कामे सुरू आहेत. अनेकजण जूनच्या पहिल्याच आठवड्यात पेरणी करतात. त्यामुळे योग्य माहिती द्यावी. चुकीच्या माहितीमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते. याकडे लक्ष द्यावे. - कालिदास कदम
पेरणीच्या अनुषंगाने पावसाचा अंदाज चुकीचा दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे किसान ॲपने कोणतीही आपत्कालीन माहिती तत्काळ द्यावी. उशिरा माहिती देणे टाळावे. - वसंत पवार, शेतकरी.
तक्रारीच्या अनुषंगाने पाठपुरावा.
किसान ॲपद्वारे उशिरा माहिती मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा कृषी विभागाच्या वतीने याबाबत पाठपुरावा केला जात आहे. यापुढे गैरसोय होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.