लातूर : यंदा चांगल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन नवी उमेद मिळाली आहे. सरत्या वर्षात जिल्ह्यातील ५६ हजार ५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३३० कोटी ९४ लाखांची रक्कम जमा झाल्याने २ लाखांपर्यंतचे थकीत कर्जदार शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक ३७० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून बळीराजा नव्या जिद्दीने बाहेर पडला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ यंदाच्या मार्चपासून सुरू झाला. २ लाखांपर्यंतच्या ७२ हजार ४५ थकीत कर्जदार शेतकऱ्यांपैकी ५६ हजार ५५ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. खरिपातील पिके काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने १ हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेली तर २ लाख ५१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पहिल्या टप्प्यात शासनाकडून १२८ कोटी ९१ लाख उपलब्ध झाले. १२५ कोटी १५ लाख थकीत राहिले आहेत.
पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. मात्र, बाजारपेठेत यंदा दरात मोठी वाढ होऊन सर्वसाधारण दर ४ हजार २७० रुपयांपर्यंत पाेहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
यंदाच्या पावसाळ्यात १२१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे रबीच्या क्षेत्रात वाढ होऊन १२७ टक्के पेरा झाला आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे.
लातूर बाजार समितीस मुदतवाढ...
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्याने राज्य शासनाने फेब्रुवारीपर्यंत विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ दिली आहे. रेणापूर, जळकोट बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने तिथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. औसा बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या जवळपास दीड महिना बंद राहिल्या.
१४ बियाणे कंपन्यांवर गुन्हे...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ८ हजार ३६७ तक्रारींची तपासणी करण्यात आली. भरपाईपोटी बियाणे, ६२ लाख रुपये देण्यात आले. तसेच अप्रमाणित बियाणेप्रकरणी १४ कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.