रेणापूर तालुक्यातील चाडगाव ते नांदगाव या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, याबाबत पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या हाेत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ४ फेब्रुवारी राेजी रेणापूर येथील तहसीलदारांना सदरचे अतिक्रमण हटविण्याबाबत आदेशीत केले हाेते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अद्याप अतिक्रमण हटविण्यात आले नाही. याबाबत चाडगाव येथील काॅंग्रेस सेवादलाचे सचिव ओमप्रकाश साेमवंशी यांनी तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधीनी आदेशीत करुनही सामान्य जनतेच्या तक्रारीची संबंधितांकडून दखल घेतली जात नाही, हेच यातून समाेर आले आहे. तर दुसरीकडे ७ फेब्रवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्ह्यात शेत रस्ते अभियानाची घोषणा केली आहे. त्याचबराेबर शेतरस्ते, पाणंद रस्ते आडविणाऱ्यांवर कारवाइ केली जाईल. असेही सांगितले आहे. मात्र, रेणापूर तालुक्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. सदरचा रस्ता अतिक्रमणमुक्त करुन शेतकऱ्यांची गैरसाेय टाळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चाडगाव-नांदगाव रस्ता अतिक्रमणमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST