महाराष्ट्र शासन वनविभाग उस्मानाबाद वन परिक्षेत्र सय्यदपूर येथे सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली असता, सय्यदपूर येथील वृक्षप्रेमींनी देवणी तहसीलदारांना याबाबत माहिती दिली. तहसीलदार सुरेश घोळवे यांनी उदगीर आणि निलंगा येथीर अग्निशमन दलाला पाचारण केले.
गावाच्या बाजूने आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. यामुळे कोणत्याही घराला आग लागली नसल्याने जीवित व आर्थिक हानी झाली नाही. या आगीत १० ते १५ उकिरडे, सरपण जळून गेले असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
आगीत वनविभागाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमातील हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार जातीने घटनास्थळी हजर होते. सोबत नायब तहसीलदार हीसामोदीन शेख, वनविभागाचे अधिकारी तेलंगे, डिगोळे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी, सय्यदपूरसह परिसरातील नागरिक आणि अग्निशमन दल यांनी परिश्रम घेतले.