तालुक्यातील एकुर्का रोड येथील वीजग्राहक त्रिशलाबाई कैलास जाधव, रुक्मीनबाई उत्तमराव शेवाळे, दिगंबर गुंडा गडदे या शेतकऱ्यांनी तीन एचपी चे डिमांड सन २००७ साली भरले आहे. मात्र, अद्याप यांना जोडणी दिली गेली नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. वीज जोडणी न देताच बिल मात्र दिले गेल्याने संबंधित शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनुक्रमे २६ हजार, ९ हजार व १० हजार रुपये बिल संबंधित शेतकऱ्यांना आकारण्यात आले आहे. वारंवार संबंधित विभागाची याबाबतीत कल्पना देऊनही बिल दिले गेल्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. सदरील शेतजमीन मलकापूर येथील संतराम महादू भालके यांनी खरेदी केली असून त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २३ ऑगस्ट निवेदन देऊन सबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची करण्यात आली होती. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. डॉ. श्रवणकुमार माने, संतराम भालेराव यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, अद्याप यावर मार्ग निघाला नसल्यामुळे सोमवारपासून अखिल भारतीय सेनेच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कृषीपंपाची जोडणी न देताच वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST