रविवारी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. एक पॅडल आरोग्य, पर्यावरण व भविष्यासाठी या निर्धाराने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, संयोजक मुख्याधिकारी भारत राठोड यांची उपस्थिती होती. पालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या वसुंधरा अभियान व आय लव्ह उदगीर फलकाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत सर्व अधिकारी, पॅडल टू गो टीम, उदगीर सायकलिंग ग्रुप, नागरिक या रॅलीत सायकल घेऊन सहभागी झाले.
नगरपरिषद कार्यालयापासून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक, शाहू चौक, उमा चौक ते मुक्कावार चौक, आर्य समाज चौक ते चौबारा मार्गे उदयगिरी किल्ला येथे पोहोचल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या संघटनांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आठवड्यातून एक दिवस सायकल वापरून पर्यावरण संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.
उदयगिरी किल्ल्यात स्वच्छता...
नगरपरिषदेच्या वतीने उदयगिरी किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली. या उपक्रमात पत्रकार, रोटी कपडा बँक टीम, पॅडल टू गो टीम, उदगीर सायकलिंग टीम, कारवा फाउंडेशन, सह्याद्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, मनोज पुदाले, आदिती पाटील कौळखेडकर, मोतीलाल डोईजोडे, ओमकार गांजुरे, सुमित मुळे आणि नगरपालिकेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.