लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोना काळात अनेकांचा जारचे साधे पाणी पिण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, दरवर्षी उन्हाळ्यात थंड पाण्याच्या जारला असणारी अधिक मागणी यंदा मात्र ४० टक्क्यांनी घटली असल्याचे चित्र आहे.
लातूर शहरात जवळपास दीड हजारांहून अधिक जारचे पाणी विक्री करणारे सेंटर आहेत. शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, बाजारपेठेतील दुकाने, सार्वजनिक दुकाने, लग्नसराई, आदी विविध कार्यक्रमांमध्ये पाण्याचे जार मागविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोहळे होत असून, थंड पाण्याच्या जारला होणारी मागणी कमी झाली आहे. तसेच शासकीय कार्यालयांतही उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. तसेच कामासाठी येणाऱ्यांचीही रेलचेल अत्यल्प आहेत. त्यामुळे थंड पाण्याची मागणी घटली आहे. थंडऐवजी जारच्या साध्या पाण्याला मागणी आहे. याचा परिणाम जार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांवर झाला आहे. लातूर शहरासह ग्रामीण भागातही थंड पाण्याच्या मागणीत कमालीची घट झाली आहे.
कोरोनामुळे अनेकजण गार पाण्याऐवजी साध्या पाण्याला पसंती देत आहेत. दररोज आम्ही साध्या पाण्याचा जार घेतो. घरपोहोच सुविधा मिळत असल्याने कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करतो. दरवर्षी उन्हाळ्यात थंड पाण्याचा जार नियमितपणे घेत होतो. मात्र, कोरोनामुळे थंड पाणी पिऊ नये, असा सल्ला असल्याने जारचे साधे पाणी मागवितो.
- काका ढोले, नागरिक
घरातील मोठा कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम, उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहान भागविण्यासाठी थंड पाणीच मागवीत असत. मात्र, गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे थंडऐवजी साध्या जारला पसंती आहे. घरीही दररोज साधेच पाणी विकत घ्यावे लागते. अनेकांनी थंड पाणी पिण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जारच्या साध्या पाण्यावरच तहान भागवावी लागते.
- तौफिक पठाण, नागरिक
दरवर्षी थंड पाण्याच्या जारला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात चांगला व्यवसाय होत असतो. मात्र, गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. त्यामुळे अनेक मोठमोठ्या ऑर्डर बंद आहेत. थंड पाण्याऐवजी साध्या पाण्याच्या जारला ग्राहकांची सध्या मागणी आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत ग्राहकांना तत्पर सेवा दिली जात आहे. शासकीय कार्यालयांसह विवाह सोहळे तसेच इतर कार्यक्रमांमध्ये थंड पाण्याचे जार घेतले जात होते. मात्र, थंड पाण्याला मागणी घटली आहे.
- नितीन मंडलापुरे, जार विक्रेते, लातूर