लातूर तालुक्यातील चिंचोली ते शिराळा या रस्त्यावर सतत वाहतूक असते. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून या मार्गावर पूल उभारण्यात आला होता. मात्र, गत पावसाळ्यात अति पाऊस झाल्याने पूर येऊन या पुलाची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या भागातील नागरिक व वाहनधारकांनी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सातत्याने मागणी केली. मात्र, अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही.
चिंचोली- शिराळा हा मार्ग या भागातील नागरिकांना लातूर, अंबाजोगाई व मुरुडला जाण्यासाठी सोयीचा आहे. परंतु, रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अंदाज न आल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळा होऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.