देवणी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तसेच ठिकठिकाणी ओढ्यांना पूर येऊन काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. मांजरा नदीला पूर आल्याने देवणी तालुक्यातील जवळगा, हेळंब, धनेगाव, टाकळी, बटनपूर, सिंधीकामट शिवारातील शेकडो एकर खरिपाची पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बोरोळ, सिंधीकामट, बटनपूर, विजयनगर व लासोना या गावातील या नदीकाठच्या परिसरातील शेती सध्या पाण्याखाली आली आहे.
एकंदर सध्याच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मांजरा नदीकाठची शेती अतिवृष्टीग्रस्त तथा पूर्णवादी झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची पाहणी करून शासकीय मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे जीवितहानी होऊ नये म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सुरेश घोळवे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी व नदी, नाले यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.