औसा : विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे भारतीय सैन्यदलातील जवान भारतमातेचे भूषण आहेत, असे गौरवोद्गार आमदार अभिमन्यू पवार यांनी काढले.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील प्रकाश घोडके, शशिकांत मेलगर व दापेगाव येथील नेताजी लिंबाळकर हे तीन जवान भारतीय सैन्यदलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माजी सैनिक संघटना व ग्रामपंचायत कार्यालय, नागरसोगा यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पवार बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच सरोजा सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता, कमलाकर सूर्यवंशी, बळीराम सूर्यवंशी, शिवाजी फावडे यांच्यासह ग्रामस्थ, माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, मलाही सैन्यदलात जाण्याची खूप इच्छा होती. पण मी जाऊ शकलो नाही. मी जरी सैन्यदलात गेलो नसलो तरी राजकारणात आहे. त्यामुळे सैनिकांची कामे करता येतात. पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार यांनी आभार मानले.
गावातून काढली मिरवणूक...
सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन हे जवान गावात आल्यानंतर ‘भारत माता की जय’ असा जयघोष करत वाद्यवृंदाच्या साथीने त्यांची गावात मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरुन वाजतगाजत मिरवणूक काढून गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिरात त्यांना आणण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.