अहमदपूर : अहमदपूर व चाकूर तालुक्यात गतवर्षी पावसामुळे व खराब वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवेळी पाऊस, धुके पडून तुरीचा व कापसाचाही खराटा झाला. त्यामुळे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागाने केले होते. त्याआधारे शासनाने नुकसानभरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना दिले होते. तेच पंचनामे ग्राह्य धरून विमा कंपनीकडून पीक विमा मंजूर करून घ्यावा. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानाचे फोटो ऑनलाईन केले नाहीत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी दूषित वातावरण व पावसामुळे पिकांवर पडलेल्या अनेक रोगांमुळे उत्पन्नात कमालीची घट झाली असून, शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, राजकुमार मजगे, भाजप तालुकाध्यक्ष हणमंतराव देवकते, अशोकराव चिंते, आर. डी. शेळके, हरीभाऊ येरमे, विठ्ठलराव बोडके, संग्राम चामे, प्रशांत पाटील, शिवाजी बैनगिरे, राम बेल्लाळे, कमलाकर पाटील, नीळकंठ पाटील, राजू खंदाडे, गोविंद गिरी, देवानंद मुळे, अमित रेड्डी, अजय काळे, प्रेमचंद शेळके, शिवराज पाटील, चंदकांत गंगथडे, प्रमोद जोशी, अजित खंदारे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, विक्रम भोसले, नगरसेवक राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, धनराज पाटील, कमलाकर शेकापुरे, शकूर जागीरदार, सुखदेव कदम, चंद्रसेन पाटील, प्रताप पाटील, संतोष कोटलवार, शिवराज चोथवे, अर्जुन गंगथडे, शंकर मुळे, शंकर चाटे, पांडुरंग कांबळे, आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.