महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्या बोलक्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शून्य ते ६ वर्षे वयोगटांतील मुले अक्षरांची ओळख करून घेतात. अंगणवाडी सेविकांमार्फत हे काम जिल्ह्यात सुरू आहे. कमी वजनाच्या बालकांना सकस आहार, औषधोपचारही केले जातात. या कामकाजात गती आणण्यासाठी मोबाईलचे वाटप केले असले तरी मोबाईल कमी रॅमचा असल्यामुळे अंगणवाडीसेविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोबाईल हँग झाल्यानंतर पर्यवेक्षकांकडे अतिरिक्त मोबाईलसाठी मागणी करावी लागत आहे. मोबाईल हँगचे प्रमाण लक्षात घेता ४ जीचे मोबाईल द्यावेत, अशी मागणी आहे.
मोबाईल ॲपवरून अशी केली जातात कामे
अंगणवाडीतील बालकांची उपस्थिती, त्यांच्या लसीकरणाची नोंद घेण्याचे काम शासनाकडून पुरविण्यात आलेल्या मोबाईल ॲपवर केले जाते.
घरोघरी भेटी देऊन बालकांच्या नोंदी मोबाईलमध्ये घेतल्या जातात. त्यामुळे अंगणवाडीमधील कामाला गती आली आहे. बालकांचे वजन, कमी वजनाची बालके, जास्त वजनाच्या बालकांच्या नोंदीही मोबाईलमध्येच घेतल्या जातात.
सध्या अंगणवाडीत बालकांचे येणे बंद असल्यामुळे घरोघरी जाऊन मुलांना दिला जाणारा आहार, त्यांच्या आरोग्याबाबतच्या तक्रारीच्या नोंदी मोबाईलमध्ये घेतल्या जातात. औषध वाटप केलेल्या नोंदीही दररोज घेऊन जिल्हा कार्यालयाकडे पाठविल्या जातात.