७० कोटींची पाणीपट्टी थकीत
शहरातील ९३ हजार मालमत्ताधारकांकडे १०९ कोटींची थकबाकी आहे. तर ५६ हजार नळधारकांकडे ७० कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता आणि नळपट्टी मिळून १७९ कोटींची थकबाकी असल्याने मनपा तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने अभय योजना सुरू करून वसुली मोहीम सुरू केली आहे. मागच्या दोन वर्षांपासून ज्यांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी एकरकमी कर भरल्यास व्याजामध्ये सूट मिळणार आहे. वसुली वाढविणे आणि मालमत्ताधारकांनाही सवलत देणे हा या योजनेचा हेतू आहे.
क्षेत्रीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा
महानगरपालिकेच्या कार्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातही मालमत्ता कर भरून घेतला जाणार आहे. शहरातील चारही झोनमध्ये ही सोय करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. गाळेधारकांच्या वसुलीनंतर आता मनपा प्रशासनाने मालमत्ताधारकांकडे मोर्चा वळविला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही वसुली मोहीम सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले.