लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघात नवीन तालुका पंचायत व जिल्हा पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना सुरू आहे. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसारित झाल्या आहेत. या मतदारसंघ पुनर्रचनेत मार्गदर्शक सूचनांचे पालन झालेले नाही. मार्गदर्शक सूचना डावलण्यात आल्या असून, राजकीय दबावामुळेच विसंगती असलेले हे नवीन मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत, असा आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. निपाणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद मतदारसंघात २५ ते ३० हजार लोकसंख्या व भौगोलिक संलग्नता असणे आवश्यक आहे. पण या सूचना धाब्यावर बसवून मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. काही अपवाद वगळता सर्वच जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये विसंगती आहे. कुरली जिल्हा पंचायत मतदारसंघात आडी, आप्पाचीवाडी, सिदनाळ या पंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. हे हास्यास्पद आहे. यामध्ये भौगोलिक संलग्नता दिसत नाही. कोगनोळी मतदारसंघाचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे हे मतदारसंघ राजकीय दबावातून तयार झाले आहेत.
निपाणी मतदारसंघात एकूण २४ तालुका पंचायत मतदारसंघ होते परंतु गोठवून ते १६ करण्यात आले आहेत. वास्तविक या भागाचे आमदार मंत्री व त्यांचे पती खासदार असताना त्यांना २४ मतदारसंघ ठेवणे शक्य होते. पण त्यांनी तसे केले नाही. या सर्व प्रकारावर जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगाशी संपर्क साधला असून, प्रस्ताव आल्यानंतर पडताळणी करू, असे आयोगाने म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो : २० काकासाहेब पाटील