अशी किरकोळ कारणावरून हळूहळू केवल आणि कणिकाची नेहमीच वादावादी होऊ लागली.
एरव्ही अतिशय प्रेमाने वागणारा केवल मध्येच असा डोकेफिरूसारखा का वागतो? तिला अनेकदा या विचाराने रात्री झोप लागत नसे.
एकदा सकाळच्या घाईत कणिकाचं जरा दुर्लक्ष झालं. गॅसवर तापत ठेवलेलं दूध ऊतू गेलं. झालं केवलला तेच निमित्त मिळालं. त्याने रागारागाने खूप बडबड केली.
“केवल, रोज काय कटकट करतोस? ती बिचारी ऐकून घेते, दुसरी कोणी असती ना तर घरात राहिलीच नसती.”
सकाळच्या घटनेने कणिकाचं ऑफिसकामातही लक्ष लागेना. तिच्या मैत्रिणीने गार्गी पेलणकरने विचारलं तिला -
“काय गं ऽ कणिका? आज अशी उदास का झालीस?”
“अगं काय सांगू? आमच्या नवरोबानं दूध ऊतू गेलं म्हणून माझ्यावर भरपूर तोंडसुख घेतलं. लग्न ठरविताना पुरुषाचा स्वभावही बघायला हवा. लग्न ठरलं की बायकोला कुठे ठेवू आणि कुठे नको, अशा तऱ्हेने वागतात आणि लग्न झालं की, पदोपदी त्यांचा पुरुषार्थ उसळतो.”
“अगं, ते काय एवढं मनावर घ्यायचंय. ते तिथेच सोडून द्यायचं. रात्री बरोबर चिकटायला घेतात. तेव्हा भांडणं, तंटे क्षणात संपलेले असतात आणि त्यांच्या त्राग्याने तुझ्या अंगाला काय भोकं पडतात का? घरोघरी मातीच्या चुली. माझाही नवरा अभिषेक असल्याच स्वभावाचा आहे. मी या कानाने ऐकते नि त्या कानाने सोडून देते. जास्त मिजास खपवून घेत नाही मी. अनादिकाळापासून संस्कृतीत पुरुष वरचढ ठरवला आहे. पुरुषसत्ताक पद्धती आता बंद करायला पाहिजे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपणही संसार प्लस कमाई करतो. पुरुषांना जरा ताणून धरले की, सुतासारखे सरळ होतात. मी आता असाच कोडगेपणा करते. बस खुशाल बोंबलत.”
“पण गार्गी, माझा स्वभाव कणखर नाहीय. मला कोणी चिडून बोललं तर लगेच रडू येतं. मी फार हळवी आहे. लहानपणापासून.”
“तू तो मुळूमुळू रडण्याचा स्वभाव सोड. वागणुकीत, बोलण्यात जरा ताठपणा ठेव. अगं अशाच सामान्य, घरगुती वादावादीने मुली चक्क घटस्फोटाची भाषा करतायत. अर्ज देऊन नवऱ्यापासून विभक्त राहत आहे. नवऱ्यावाचून काही अडत नाही आणि असले तिरशिंगराव, त्यांच्यासह संसार करणं आजकाल मुली मुळीच खपवून घेत नाहीत. तुला एक आपलं सांगितलं. टक्केटोणपे खाऊन होईल तो सरळ.”
दोन वर्षे अशीच निघून गेली. कणिकाला दिवस गेले. आता सासूबाई आणि केवल तिला खूप जपू लागले. तिच्या आवडीनिवडी पूर्ण करू लागले. कणिका कामावर मात्र जात होती. पण, घरी थकून आल्याने स्वयंपाकाचा संध्याकाळचा प्रश्न निर्माण झाला. मग तिने एक स्वयंपाकीण लावली. जरा आराम मिळू लागला. केवल जे पानात पडेल ते खाऊ लागला. आता आवड-निवड, मिजास करून जमणार नव्हतं. कारण, घरात परिस्थिती वेगळीच होती. मग कणिका पहिल्या बाळंतपणाला माहेरी गेली.
एक दिवस गोड, आनंदाची बातमी आली. कणिका बाळंत झाली. मुलगा झाला. सासूबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी केवलला मागे लागून नातू बघण्यासाठी तगादा लावला. एकदाचं नातवाचं तोंड बघितलं. त्याला मांडीवर घेतलं. तेव्हा त्यांना बरं वाटलं. बारसं थाटात झालं. मुलाचं नाव ‘सुकांत’ ठेवलं, सगळ्यांच्या एकमतानं.
कणिका आता सहा महिने रजेवर होती. स्तनदा माता संगोपन रजा. तीन महिन्यांनी ती सासरी आली. सुकांत अगदी गोंडस, बाळसेदार, गोड मुलगा होता. त्याची एक तऱ्हा होती. दिवसा जास्त झोपत असे. रात्री मात्र जागायचा. साहजिकच त्याला पाळण्यात आंदुळत बसावं लागे, कणिकाला. शू, शी झाली की तो रडायला लागे. भूकही लागायची. मग कणिकाला त्याला जवळ घेऊन पाजावं लागे. दुपटी बदलावी लागत. रात्रीच्या शांततेत सुकांतचा रडण्याचा आवाज खूप मोठा व्हायचा.
लगेच केवल चिडून उठायचा. तिरसटपणे बोलायचा.