लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शिरोळ तालुक्यातील सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी तालुक्यातील त्यांच्या विरोधातील सर्व गट एकवटले आहेत. वरकरणी ही जिल्हा बँकेची लढाई असली तरी त्यामागे यड्रावकर यांना पुढील विधानसभा निवडणुकीत रोखण्याचीच मोर्चेबांधणी आहे. तालुक्यातील जिल्हा बँकेची मतांची संख्या पाहता यड्रावकर यांना रोखणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे.
यड्रावकर मूळचे राष्ट्रवादीचे, परंतु शिरोळची विधानसभेची जागा दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने स्वाभिमानी संघटनेला सोडली. त्यामुळे विधानसभेला यड्रावकर यांना बंडखोरी केली व विजय खेचून आणला. नुसते आमदार म्हणून ते थांबले नाहीत तर लगेच शिवसेनेला पाठिंबा दिला व जी काही ताकद वापरायची ती वापरून चक्क राज्यमंत्रीपद मिळवले. त्यांचे हे राजकीय वर्चस्व आताच रोखण्याची गरज तालुक्यातील सर्व विरोधकांना वाटते. आमदारकीचा रस्ता जिल्हा बँक व ‘गोकुळ’च्या सत्तेतून जातो. त्यामुळे जिल्हा बँकेत अगोदर त्यांना त्या सत्तेपासून बाजूला करण्यासाठी पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत. पण त्याच्या आड येणारी कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
१.शिरोळ तालुक्यात संस्था गटात १४९ मते आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत राजेंद्र यड्रावकर यांच्या पाठीशी स्वाभिमानी, दिवंगत सा. रे. पाटील गट आणि आवाडे गट होता हे खरे असले तरी या तिन्ही गटांची मतांची ताकद मर्यादित आहे. शिवाय यड्रावकर हे तब्बल ५० मतांनी विजयी झाले आहेत.
२.जिल्हा बँक असो की गोकुळ, तिथे संचालक झाला की त्या संस्थांशी त्यांचा नित्य संपर्क येतो. त्यातून कामे करून दिली जातात. लोक जोडले जातात. ठराव कुणाच्या नावे करून घ्यायचे याची जोडणी आधीच लावली जाते. या कामात यड्रावकर आधीच फार पुढे गेले आहेत.
३. राज्यमंत्री यड्रावकर यांची येईल त्या व्यक्तीचे काम करून देण्याची पध्दत आहे. ते कुणासाठीही सहज उपलब्ध होतात. शिवाय त्यांनी गेल्या वर्षभरापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. शिवाय मतदारांत ’गुंतवणूक’ही केली आहे.
४. यड्रावकर यांना जिल्हा बँकेच्या सत्तारुढ आघाडीतून बाजूला करणे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही शक्य नाही. कारण ते मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. संचालक म्हणून निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे.
५. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतील निर्णायक ५० मते राज्यमंत्री यड्रावकर गटाकडे आहेत. शिवाय अलीकडील काही महिन्यांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. पालकमंत्री पाटील यांच्याविरोधातही त्यांना जिव्हारी लागणारी विधाने केली आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून यड्रावकर यांना बाजूला करता येणे शक्य नाही.
६.राज्यमंत्री यड्रावकर यांची दुसरी फळी फारच सक्रिय आहे. आर्थिक व राजकीय सत्ता असल्याने सर्व पातळीवर जोडण्या लावण्याची त्यांची ताकद आहे. याउलट विरोधातील समझोत्याचे उमेदवार समजले जाणाऱ्या दत्त शिरोळ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा कारखाना, उदगाव बँक, तालुका खरेदी-विक्री संघाचा व्याप जास्त आहे. त्यांच्याकडे कुटुंबातील दुसऱ्या फळीतील पाठबळ अपुरे आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतांची ताकद नगण्य आहे.
जिल्हा बँक निवडणुकीतील गतवेळचे चित्र
राजेंद्र पाटील यड्रावकर : ९७
विठ्ठलराव नाईक निंबाळकर : ४७
मतदान केले नाही : ०५
यड्रावकर तब्बल ५० मतांनी विजयी.
गत विधानसभा निवडणुकीतील चित्र
राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) : ९० हजार ३८
उल्हास पाटील (शिवसेना) ) ६२ हजार २१४
सावकर मादनाईक (स्वाभिमानी) : ५१ हजार ८०४