अमर पाटील : कळंबा
हवामान खात्याने यंदा पावसाळा लवकर सुरू होऊन गतवर्षीपेक्षा जास्त समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उपनगरांत मान्सूनपूर्व केली जाणारी नालेसफाई, स्वच्छतागृहे दुरुस्ती, खड्डे पडलेल्या रस्त्यांचे पॅचवर्क, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी ही कामे पावसाळ्यापूर्वी होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आजही उपनगरांतील विविध प्रभागांत कॉलनीअंतर्गत रस्ते विकसित नाहीत; तर मुख्य रस्ते खड्डेमय बनले आहेत. १५ मेनंतर डांबरीकरण अथवा रस्ते पॅचवर्क कामे हाती घेता येत नसल्याने रस्त्याचे पॅचवर्क कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
उपनगरांतील विविध प्रभागांत बारा नैसर्गिक नाले वाहत असून नालेसफाई परिणामकारक न झाल्याने राजलक्ष्मीनगर, साळोखेनगर, कणेरकरनगर, तपोवन, जीवबा नाना पार्क, सुर्वेनगर, रायगड कॉलनी या विविध प्रभागांत ऐन पावसाळ्यात मोठ्या नागरी वस्तीत पावसाचे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होते. तर क्रशर चौक, देवकर पाणंद मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होते.
गतवर्षी रंकाळा तलाव, साळोखेनगर प्रभागात पाच महाकाय धोकादायक वृक्ष नागरी वस्तीत कोसळून सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली होती; तर कळंबा-गारगोटी रस्त्यावर महाकाय वृक्ष कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. वीज वितरण विभागामार्फतसुद्धा अद्यापही विजेच्या तारांशी संपर्क करणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणी मोहीम सुरू करण्यात आली नाही.
उपनगरात क्रशर चौक, संभाजीनगरातील सुधाकर जोशीनगर, जुना वाशीनाका, निर्माण चौक, कात्यायनी कॉम्प्लेक्स येथे मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे असून त्याची मोठी पडझड झाली आहे. पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती क्रमप्राप्त असून याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट : प्रशासनापुढे पावसाळापूर्व कामाचे नियोजन मांडलेले असते; पण ते गंभीरपणे घेतले जात नाही. शिवाय उपनगरांचा विचार करता तोकड्या विकासनिधीमधून सर्व समस्या निराकरण होत नाहीत.
- दीपा मगदूम, माजी नगरसेविका, राजलक्ष्मीनगर.
वेळेत सर्व कर भरून नागरिक प्रशासनास सहकार्य करतात. मात्र मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नंदकुमार पिसे, कणेरकरनगर
फोटो : २२ कळंबा नालेसफाई
कोल्हापुरातील राजलक्ष्मीनगर प्रभागातील नैसर्गिक नाल्यांच्या सफाईचे काम कित्येक वर्षे झाले नसल्याने ऐन पावसाळ्यात निम्म्याहून अधिक प्रभागात नागरी वस्तीत पाणी शिरते.