कऱ्हाड : ‘राज्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्रही अपवाद नाही. मराठवाड्यात जरूर कृत्रिम पावसाचे प्रयोग करा. पण पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पावसाची गरज आहे. महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरण भरल्याशिवाय अनेक प्रश्न संपणार नाहीत. म्हणून कृत्रिम प्रयोग इथेही करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे,’ अशी माहिती सेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘संवाद’ अभियानास कऱ्हाडमधून प्रारंभ केला. त्यावेळी कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसैनिकांसमोर ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, नितीन काशिद, शशिकांत हापसे, सतिश तावरे, प्रमोद तोडकर उपस्थित होते.प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, ‘आपला पक्ष देशात अन् राज्यात सत्तेत सहभागी आहे. अशावेळी हा पक्ष ग्रामिण भागापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. म्हणून यापुढील प्रत्येक निवडणूक सेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेवूनच आपणाला लढायची आहे. येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक असोत अथवा काही वर्षावर येऊन ठेवलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका. त्या आपल्याला पक्षाच्या माध्यमातून लढवायच्या आहेत. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिली.राज्यात दुष्काळाची स्थिती भयंकर आहे. शिवसेना पक्षीय पातळीवरही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्र सधन समजला जातो. इथं कृत्रिम पावसाची गरज काय? असे काही जण म्हणतील पण कऱ्हाडचेच उदाहरण घ्या. कऱ्हाड दक्षिण बऱ्यापैकी सुजलाम् सुफलाम् मात्र, कऱ्हाड उत्तरमध्ये पाणी टंचाई, असे अनेक तालुक्यात चित्र आहे. आणि विशेष म्हणजे पाटण तालुक्यात असणारे कोयना धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. ते पूर्ण भरले नाही तर वीजेचा प्रश्न महाराष्ट्राला भेडसावणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे ढगांचा सुकाळ असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल. हे आपण शासनाला पटवून देणार असल्याचेही बानुगडे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रविवारी पाटणमध्ये ‘संवाद’चा समारोपशिवसेनेचे उपनेते प्रा. नितीने बानुगडे पाटील यांनी मंगळवारी कऱ्हाडमधून सुरू केलेल्या ‘संवाद’ अभियानाचा समारोप रविवार दि. ३० रोजी पाटण येथे होणार आहे. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्णातील सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पाऊस हवा
By admin | Updated: August 25, 2015 23:49 IST