कोल्हापूर : ग्रामीण भागातील वातावरण ढवळून काढणाऱ्या आणि राजकारणाची नशा घराघरांत, प्रत्येकाच्या अंगात भिनविणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. याचवेळी ४८ ग्रामपंचायतींत पोटनिवडणूकही होणार आहे. उमेदवारी अर्ज त्या-त्या तहसीलदार कार्यालयात भरले जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. १० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण पराकोटीला पोहोचलेले पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने थेट सहभाग घेतला नसला तरी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते ही निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गावातील आपले राजकारण टिकविण्यासाठी स्थानिक गटांनी कंबर कसली आहे. गटाचे उमेदवार कोण असावेत याचीही चाचपणी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर भावकीचा प्रभावही मोठा असतो. त्यामुळे ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते. त्यामुळे अशा पातळीवरही स्थानिक गटांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणासुद्धा कार्यरत झाली असून ४६४ निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)
ग्रामसंग्राम आजपासून
By admin | Updated: July 4, 2015 00:45 IST