कोल्हापूर : निरोगी माणूस कोणत्याही वयोगटातील असला, तरी पांढरी लघवी होईपर्यंत पाणी पिणे आवश्यक आहे, असे युरोलॉजिस्ट, नेप्रॉलॉजिस्टांचे मत आहे. तहान लागली की पाणी प्यावे आणि लघवी पिवळी न होता पांढरी होईल इतके पिण्याचे प्रमाण ठेवावे, असेही ते सांगतात. याउलट किडनी विकार आणि हृदयविकार असणाऱ्यांना अती पाणी पिल्यास त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शरीरात पाणी महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच शरीरातील पाण्याचे प्रमाण सातत्याने कमी झाल्यास विविध विकार होण्याचा धोका असतो. सर्वसाधारणपणे शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे एकवेळ अन्न नसेल, तर चालेल तीव्र तहान लागल्यास पाणी प्यावेच लागते, असे वैद्यकीय शास्त्र सांगते.
१) शरीरात पाणी कमी पडले तर
प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी विविध मार्गाने जाण्याच्या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा 'डिहायड्रेशन' असे म्हणतात. लघवी, मल, घाम यातून रोज पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीरातील काही प्रमाणात क्षारही जातात. पण हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो. डिहायड्रेशन झाल्यास घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा असा त्रास जाणवू शकतो.
२) शरीरात पाणी जास्त झाले तर
किडनी आणि हृदयविकार असणाऱ्यांनी जास्त पाणी पिल्यास उलटी होणे, डोकेदुखी, मानसिक स्थिती बिघडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. किडनीवर जास्तीचा ताण पडताे. शरीरातील पाणी बाहेर टाकण्यास किडनी सक्षम नसेल, तर शरीरातील इलेक्ट्रोलाईटचा ताळमेळ बिघडू लागतो आणि अधिकचे पाणी शरीरात साठू लागते. परिणामी शरीराचे वजन वाढत जाते. साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. यामुळे शरीराला हानी होऊ शकते.
३) कोणी किती प्यावे पाणी?
वयोगट दिवसाला किती पाणी (लिटरमध्ये)
लहान मुले अर्धा लिटरपर्यंत
१५ वर्षांपर्यंत १ ते दीड
१६ ते ६१ वर्षांपर्यंत २
कोट
४) तज्ज्ञ काय म्हणतात?
निरोगी माणसाने जास्त पाणी पिल्यास आरोग्याला हानीकारकही नाही आणि फायदाही नाही. पण पिवळी लघवी होत असल्यास शरीरातील पाणी कमी झाले आहे, असे समजून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. लघवी पांढरी होत असल्यास पाण्याचे प्रमाण योग्य आहे, असे समजावे. यामुळे नेहमी तहान लागल्यानंतर पाणी पित राहावे.
डॉ. अभिजित कोराणे, नेप्रॉलॉजिस्ट
लहान मुलांना दीड, तर १५ वर्षावरील व्यक्तींना कमीत कमी दोन लिटर पाणी दिवसाला प्यावे. कष्टाची कामे करणाऱ्यांनी यापेक्षा अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. निरोगी माणसाने अधिक पाणी पिल्यास आरोग्याला अपायकारक नाही; पण हृदय विकारग्रस्त, किडनी विकारग्रस्तांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. अन्यथा त्रास होऊ शकतो.
डॉ. युवराज सावंत, नेप्रॉलॉजिस्ट