कोल्हापूर : ‘ग्रामीण चेहरा असलेले विद्यापीठ’, नाव घेताच काहीसे वेगळ्या नजरेने पाहण्याचा विद्यार्थ्यांना आलेले अनुभव, केली जाणारी कुचेष्टा, या विद्यापीठाची पदवी असेल, तर नोकरी देताना दिली जाणारी बगल असा स्वरूपातील गैरसमजांना शिवाजी विद्यापीठाने दूर लोटले आहे. गुणवत्तेच्या जोरावर मुंबई, पुणे आदी विद्यापीठांना मागे टाकत राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मूल्यांकन पटकावून कोल्हापूरचे हे विद्यापीठ देशात ‘रोल मॉडेल’ बनले आहे. कोल्हापूर ते सोलापूरपर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची सोय विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध झाली. स्थापनेपासूनच या विद्यापीठाला मुंबई, पुणे आदींशी सातत्याने गुणवत्तेबाबत स्पर्धा करावी लागली. त्यातूनच मग, ग्रामीण विद्यापीठ, नाव घेताच होणारी कुचेष्टा, अशा अनुभवांनाही काही विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. अशा स्थितीतही बदलत्या काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्ररचना, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक प्रणाली, भक्कम प्रशासकीय कामकाज, संशोधनात वेगळेपण आदींच्या माध्यमातून विद्यापीठाने ‘सुवर्णमहोत्सवी’ वाटचाल केली. २००४ मध्ये ‘नॅक’कडून ‘बी प्लस’ मानांकन मिळाले. त्यानंतर २००८ मध्ये त्यात घसरण होऊन मानांकन ‘बी’ झाले. त्यानंतर २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळवायचे या ध्येयाने विद्यापीठातील प्रत्येक घटकाने तयारी केली तसेच नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत सुविधा, अध्यायन-अध्यापन व मूल्यमापन आदी मुद्द्यांवर सरस कामगिरी करत राज्यात ३.१६ इतक्या सर्वाधिक गुणांकनासह ‘अ’ मानांकन पटकाविले. राज्यातील अन्य विद्यापीठांना मागे टाकत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध स्वरूपांतील असलेले गैरसमज पुसून टाकले आहेत. शिवाय शैक्षणिक गुणवत्तेच्या केंद्रबिंदूचा कोल्हापूरपर्यंत विस्तार वाढविला आहे. विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीची ‘नॅक’ ने प्रशांसा केली. ‘नॅक’ अन्य विद्यापीठांना मूल्यांकनाच्या तयारीबाबत शिवाजी विद्यापीठाचे उदाहरण देत आहे. विद्यापीठाने केलेले ग्रीन, एनर्जी आॅडिट अशा महत्त्वाच्या अहवालांच्या दोन प्रती ‘नॅक’ने घेतल्या असून त्या आपल्या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. मूल्यांकनाच्या तयारीबाबत विद्यापीठाशी मुुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, वर्धा केंद्रीय विद्यापीठाने संपर्क साधला आहे. शिवाय ‘नॅक’च्या प्रक्रियेत काम केलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जात आहे. मूल्यांकनातील अव्वल कामगिरी, लौकिकामुळे कोल्हापूरकरांसह विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाचा ऊर अभिमानाने फुलला आहे. (प्रतिनिधी)......................................................आता ‘ग्लोबल’ झेपग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असलेले विद्यापीठ हे ग्रामीण राहिले नसल्याचे शिवाजी विद्यापीठाने दाखवून दिले आहे. शिवाय मुंबई, पुण्यात असलेला शैक्षणिक गुणवत्तेचा केंद्रबिंदू कोल्हापूरपर्यंत वाढविला आहे. गुणवत्तेच्या स्पर्धेत आम्ही देखील उतरलो आहोत. सुवर्णमहोत्सवी वर्षातील पर्दापणापासून ‘लोकल टू ग्लोबल’ असे ध्येय घेऊन काम सुरू केले. पहिल्या टप्प्यावर नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले. बदलत्या परिस्थिती वेध घेऊन ‘ग्लोबल’ झेप घेण्याच्यादृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू आहे.- कुलगुरू डॉ. एन. जे. पवार .............................................................................अव्वल गुणांकन‘नॅक’कडून झालेल्या गुणांकनात शिवाजी विद्यापीठ अव्वल आहे. विद्यापीठाला ३.१६ गुण मिळाले आहेत. त्यापाठोपाठ ३.१४ गुणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (३.८), मुंबई विद्यापीठ (३.५) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (३.१) आहे...................................................................................(शिवाजी विद्यापीठाचे संग्रहित छायाचित्र वापरावे)आता ‘ग्लोबल’ झेपगुणवत्तेच्या स्पर्धेत आम्हीही उतरलो आहोत. सुवर्णमहोत्सवी वर्षातील पदार्पणापासून ‘लोकल टू ग्लोबल’ असे ध्येय घेऊन काम सुरू केले. पहिल्या टप्प्यावर नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले. बदलत्या परिस्थिती वेध घेऊन ‘ग्लोबल’ झेप घेण्याच्यादृष्टीने विद्यापीठाची तयारी सुरू आहे.- कुलगुरू डॉ. एन. जे. पवार
विद्यापीठ बनले ‘रोल मॉडेल’
By admin | Updated: December 14, 2014 23:58 IST