रमेश वारके- बोरवडे - जाऊ का नको, जाऊ का नको म्हणत म्हातारी मरता मरता जिवंत झाली. सरणावरून परत आली. मग तिकडे सरणावर कोंबडी जाळली. पुन्हा बारा तासांनी म्हातारीने जाणेच पसंत केले. ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ अशी म्हणण्याची घटना कागल तालुक्यातील सोनाळी येथे आज, सोमवारी सकाळी घडली. बारा तासांनंतर परत मृत्यूने त्या म्हातारीला कवटाळले. आक्काताई विष्णू खोत असे तिचे नाव आहे. या घटनेची चर्चा सोनाळीत रंगली.याबाबत माहिती अशी, सोनाळी (ता. कागल) येथील आक्काताई खोत या वृद्ध महिलेचा काल, रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मृत्यू झाला. याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी तिला तपासले. श्वासच बंद झाल्याने ती गेल्याचे निश्चित झाल्यानंतर याची माहिती पै-पाहुणे यांना देण्यात आली. गावातही बातमी समजली. बघता बघता ग्रामस्थ व पै-पाहुणे, नातेवाईक गोळा झाले. रात्री आठच्या दरम्यान तिचे स्मशानभूमीत सरणही रचण्यात आले.मृत्यूनंतरचा इतका निधी आटोपून त्या म्हातारीला गरम पाण्याची अंघोळ घालून तिला साडी नेसवून तिरडीवर झोपवले. कफन बांधून गुलाल टाकला. चार खांदेकरी ती तिरडी उचलण्यात पुढे आले असता त्यातील डी. एम. चौगुले यांचे लक्ष त्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाकडे गेले आणि त्या म्हातारीचे पोट हालत असल्याचे त्यांनी इतरांच्या लक्षात आणून दिले आणि म्हातारी जिवंत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ व नातेवाइकांची एकच धावपळ सुरू झाली. तिला तिरडीवरून खाली घेतले. बांधलेले कफन सोडून परत त्या म्हातारीला घरी नेले. सर्वजण या घटनेने आश्चर्यचकीत झाले. घरी आणल्यानंतर म्हातारीची हाताची हालचाल सुरू झाली. पण इकडे स्मशानभूमीत तिचे सरण रचले होते. प्रथापरंपरेनुसार त्या सरणात कोंबडी जाळून ते सरण पेटवण्यात आले. परंतु, हा क्षण अवघा बारा तासच टिकला. कदाचित नियतीला हे मान्य नसावे. मृत्यूने अखेर तिला आज, सोमवारी सकाळी सहा वाजता कवटाळले. तिच्या मृत्यूची खात्री झाल्यावरच तिला शेवटी अनंतात विलीन व्हावे लागले. घटना काहीही असो, नियतीपुढे सर्वजण छोटेच असतात. याचे प्रत्यंतर सोनाळीकरांना आज आले. या घटनेची चर्चा मात्र दिवसभर ग्रामस्थांत सुरू होती.
म्हातारी सरणावरून परतली बारा तासांसाठी
By admin | Updated: July 28, 2014 23:19 IST