जयसिंगपूर : गेली ३० वर्षे आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात काम करताना एकदाही नक्षलवाद्यांनी आम्हाला त्रास दिला नाही. आदिवासी समाजातील सहकार्याची भावना पाहून शिक्षणाचा व शहाणपणाचा काहीही संबंध नाही, हे जाणवते. तेथील महिलांचा विनयभंग होत नाही, लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही, एकही भिकारी तेथे नाही, त्यामुळे शहरी समाज सुशिक्षित झाला असला तरी सुसंस्कारित कोण? असा प्रश्न निर्माण होतो, असे प्रतिपादन डॉ. राणी बंग यांनी केले.इंडियन मेडिकल असोसिएशन व जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने येथील मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. नलिनी पाटील होत्या. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय कुरडे, जयसिंगपूर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील, डॉ. अनिल तकडे, डॉ. सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. प्रारंभी स्वागत डॉ. पायल पाटील यांनी केले. डॉ. नीलम बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, डॉ. शांता पाटील, डॉ. बी. ए. शिखरे, विठ्ठल पाटील, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, डॉ. अकलंक चौगुले, डॉ. प्रिया खाडे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. अतिक पटेल, डॉ. विक्रम जैन, डॉ. अभी खटावकर, डॉ. सचिन पुजारी उपस्थित होते.
आदिवासी समाज सुसंस्कारित
By admin | Updated: November 4, 2015 23:32 IST