इचलकरंजी : शासनाने अव्यवहार्य किमान वेतन जाहीर केले असल्याने अव्यवहार्य सुधारित किमान वेतनामुळे यंत्रमाग उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणून शासनाच्या विरोधात आणि उच्च न्यायालयात व्यवहार्य किमान वेतन सादर करण्याच्या मागणीसाठी आज, शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयावर यंत्रमागधारकांचा मोर्चा काढण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी घोषित केला.यंत्रमाग उद्योगामधील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने गेले ३८ दिवस संप सुरू ठेवला आहे. ८० टक्के यंत्रमाग कारखाने बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी इचलकरंजीतील यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी औद्योगिक वसाहतीमधील कल्याण केंद्राच्या आवारात मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कोष्टी होते.सतीश कोष्टी म्हणाले, पॉवरलूम असोसिएशनने किमान वेतनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशा अव्यवहार्य किमान वेतनामुळे यंत्रमाग उद्योग मोडून पडेल, याबाबतची कल्पना आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनासुद्धा दिली आहे. सागर चाळके म्हणाले, सध्या आपण कामगारांना सहा हजार ९०० रुपये देत असताना शासनाने अचानकच दहा हजार ५७३ रुपये घोषित करून कारखानदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाच्या अस्तित्वासाठी आजच्या मोर्चामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याबरोबर आमदार सुरेश हाळवणकर यांनीसुद्धा सहभागी व्हावे.शेट्टी व मंत्री पाटील यांच्यावर टीकागुरुवारच्या मेळाव्यामध्ये काही वक्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना यंत्रमाग उद्योगावरील संकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते असूनसुद्धा ते कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून सवड काढत नाहीत, अशी जोरदार टीका केली. तसेच आमदार हाळवणकर यांना यंत्रमागधारकांनी निवडून आणले आहे, याची जाणीव ठेवावी, असाही इशारा देण्यात आला.
शासनाच्या विरोधात आज यंत्रमागधारकांचा मोर्चा
By admin | Updated: August 27, 2015 23:56 IST