कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. अशाच व्यावसायिकांपैकी एक असलेला टिंबर व्यवसायही मोठा अडचणीत आला आहे. लाॅकडाऊनमुळे लाकडाची आवक नसल्याने आरा यंत्रांना काम नाही. कामगारांचा पगारही मालकांवर पडू लागला आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडी चौकटी, तर घरातील फर्निचरसाठी लागणारे लाकूड साहित्यही मिळेनासे झाले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून या व्यावसायिकांना सुमारे २५ कोटी हून अधिकचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात आरा यंत्रकांसह २२५ हून अधिक टिंबर व्यापारी, व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडे सुमारे ३००० पेक्षा अधिक कामगार आणि या व्यवसायावर आधारित किमान दहा हजारांहून अधिक जण निर्भर आहेत. कोल्हापुरातील टिंबर मार्केटसह जिल्ह्यातील विविध लाकूड व्यापाऱ्यांकडे आफ्रिकन सागवान आणि कोकण सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात येते. त्याच्यातून घरांच्या दरवाज्यांसाठी लाकडी चौकटी, दरवाजे, सेंट्रिंग कामासाठी लागणारे लाकूड तयार करण्याचे कामही थंडावले आहे. फर्निचरचे कच्चे साहित्य जसे की प्लायवूड, सनमायका आदींच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. बांधकाम व्यवसाय आणि लाकूड व्यवसाय परस्परांशी निगडित व्यवसाय आहे. राज्यासह परराज्यातून वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड हव्या त्या मोजमापानुसार कापण्यासाठी आरा यंत्र कारखान्यात व्यापारी पाठवीत असतात. मात्र, ही यंत्रे लाॅकडाऊनमुळे बंद असल्याने अपेक्षित लाकूड फाटा बांधकाम व्यावसायिकांना मिळेनासा झाला आहे.
बांबू व्यवसाय थंडावला
पावसाळ्यापूर्वी अनेक बांधकाम व्यावसायिक आणि ज्यांची घरे खापऱ्यांची आहेत, असे नागरिक घराच्या छताकरिता बांबू विकत घेतात, तर बांधकाम ठेकेदार बांधकामाची पायंडे बांधण्यासाठी आणि स्लॅबला ठेपा देण्यासाठी बांबूची खरेदी मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये करतात. यंदा मात्र सलग दुसऱ्या वर्षी लाॅकडाऊन ऐन हंगामात आल्यामुळे हे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. बांबूचे सौदेही बंद पडले आहेत.
स्वीचेस बोर्डचे उत्पादनही घटले
कोल्हापुरातील टिंबर मार्केटमध्ये इलेक्ट्रिकल स्वीचेसकरिता सनमायकाचे लाकडी तयार बोर्ड मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात. हे उत्पादित बोर्ड राज्यासह उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पाठविले जातात. मात्र, लाॅकडाऊनमुळे हा व्यवसायही अडचणीत आला आहे.
कोट
लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील एकूण टिंबर व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे सुमारे २५ कोटींहून अधिकचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. गेल्या लाॅकडाऊनपासून व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले आहे.
- वसंतराव देशमुख, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा टिंबर असोसिएशन
प्रतिक्रिया
या व्यवसायावर आधारित असलेल्या हजारो हातांना काम नाही. याशिवाय फर्निचरसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करणारे टेम्पोचालक, रिक्षाचालकांनाही लाॅकडाऊनमुळे काम नाही. कामगारांचे पगारही मालकांच्या अंगावर पडत आहे.
-विकास पाटील, लाकूड व्यापारी,