दहिवडी / पुसेगाव : बोथे (ता. माण) येथील डोंगरावर पवनचक्की उभारणीसाठी आणलेल्या जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोट होऊन तीनजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड करून ते पेटवून दिले. कार्यालयासमोर असणारा ट्रकही पेटवून दिला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, दहिवडी पोलिसांनी पवनचक्की कंपन्यांच्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन माहिती घेण्यास प्रारंभ केला. दादासाहेब रामचंद्र जगदाळे (वय ५0), संदीप उत्तम माने (३५), शशिकांत पांडुरंग कुलकर्णी (३५, सर्व रा. बोथे, ता. माण, जि. सातारा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जावेद उस्मान मुलाणी (३२), संदीप चंद्रकांत घाडगे (३0), सूर्याजी रोहिदास शिंदे (२५, सर्व रा. कुळकजाई, ता. माण), शिवाजी बजरंग सातव, बापू जगन्नाथ घाडगे (३५, दोघे रा. तेलदरा-मलवडी) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माण तालुक्यातील बोथे येथील ‘जंगला’ नावाच्या शिवारातील डोंगरावर ‘सुझलॉन’, ‘वेस्टास’ आणि ‘कंटीनम एनर्जी’ने पवनचक्क्या उभारल्या आहेत. येथील बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी थोडीफार कामे अजूनही सुरू आहेत. ‘कंटीनम एनर्जी’ची सहयोगी म्हणून येथे ‘बोथे विंड फार्म डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड’ कार्यरत आहे. या कंपनीने येथे कामगारांसाठी निवासस्थाने आणि साहित्य ठेवण्यासाठी शेड उभारली आहेत. जे शेड उभारले आहे ते ‘कमल एंटरप्रायजेस’चे आहे. त्याचठिकाणी ‘बोथे विंड फार्म’ आणि ‘कमल एंटरप्रायजेस’ने जिलेटिन ठेवल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशिरा दिली. ‘कमल एंटरप्रायजेस’ कंपनीने येथे दीडशे फूट लांबीचे गोदाम उभारले असून यामध्ये जिलेटिनचा साठा करून ठेवला होता. बोथे तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ येथे कामगार आणि सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे काही कामगार येथे कामावर आले. सुरक्षारक्षक तर येथे अगोदरच होते. यानंतर थोड्याच वेळात बरोबर नऊ वाजता येथे शेडमधील जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. या भीषण स्फोटाने परिसरात धुरळा व प्रचंड आवाज होऊन परिसर हादरून गेला. दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून येथील धुरळा दिसत होता. परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले तर अनेक घरांवरील कौले फुटली.सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली त्यावेळी बहुतांश बोथे ग्रामस्थ घरीच होते. स्फोटाच्या आवाजाने ग्रामस्थ डोंगराच्या दिशेने निघाले. घटनास्थळी आल्यानंतर त्यांना पत्रे, पवनचक्की साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. छिन्नविच्छिन्न ढिगाऱ्यातून त्यांनी जखमींना बाहेर काढले. यामध्ये शशिकांत कुलकर्णी जागीच ठार झाले होते. त्यांच्या मृतदेहाची चाळण झाली होती. अन्य सातजण स्फोटापासून दीडशे ते दोनशे फूट दूर फेकले होते. त्यांच्या अंगावर शेडच्या पत्र्यांचा खच पडला होता. घटनास्थळाचे दृश्य पाहून अनेकजण घाबरून गेले. दरम्यान, रामभाऊ जगदाळे तसेच अन्य ग्रामस्थांनी ढिगाऱ्यातून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले. हा प्रकार सुरू असतानाच बोथे येथील संतप्त ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीचे कार्यालय फोडले. आतील संगणक, खुर्च्या, टेबल, फर्निचर तसेच इतर साहित्य बाहेर काढले आणि पेटवून दिले. कंपनीबाहेर उभा असणारा ट्रकही पेटवून दिला. म्हसवड नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोविली आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. ही माहिती समजताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांच्यासमवेत बाँबशोधक व नाशक पथक तसेच श्वानपथक होते.
जिलेटिनच्या स्फोटात तीन ठार
By admin | Updated: January 10, 2015 00:28 IST