नृसिंहवाडी : परिसरात पडलेला पाऊस व धरण क्षेत्रातील विसर्गामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सात फुटाने वाढ झाली. येथील दत्त मंदिरात मंगळवारी सकाळी पाणी आले व दुपारी साडेचार वाजता चालू सालातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अजूनही दर्शनासाठी बंदच असल्याने या सोहळ्याचा भाविकांना लाभ घेता आला नाही.
गेले काही दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत सात फुटाने वाढ झाली. पाणी पातळीत वाढ झाली. नदीच्या पाणी पातळीने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावरील संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.प.नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरात ठेवण्यात आली असून तेथे त्रिकाळ पूजा चालू आहे.
दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील दत्त देव संस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
फोटो - १४०९२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सात फुटाने वाढ होऊन येथील दत्त मंदिरात पाणी शिरले व चालू सालातील तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. (छाया-प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी)