कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणांहून म्हशी, गायी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या बाप-लेकास करवीर पोलिसांनी आज, गुरुवारी अटक केली. संशयित आरोपी राजाराम विष्णू बारड (वय ४४, रा. धामोड, ता. राधानगरी) त्याचा मुलगा उत्तम (२२) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच म्हशी व एक गाय अशी सुमारे तीन लाख किमतीची जनावरे हस्तगत केली. या दोघांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार बिंदू चौक उपकारागृहात रवानगी केली. जिल्ह्यातून म्हशी चोरीला जात होत्या. यामुळे शेतकरी वैतागले होते. दरम्यान, साहाय्यक फौजदार रमेश ठाणेकर यांना म्हशी चोरांची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार त्यांनी उत्तम बारड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यामध्ये त्याचा वडील राजाराम मदत करीत असे. उत्तम हा म्हैस किंवा गायींची चोरी करून वडिलांच्या ताब्यात देत असे. तो जनावरे लपवून आठवडा बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जात असे. त्याठिकाणी मांडवली करणाऱ्या व्यापारी लोकांच्या मदतीने जनावरांची विक्री करत असे. यात काही व्यापारीही चौकशीच्या भोवऱ्यात अडकले. संशयित बाप-लेकांकडून पोलीस कसून माहिती घेत आहेत.
जनावरे चोरणाऱ्या बाप-लेकास अटक
By admin | Updated: December 19, 2014 00:46 IST