इचलकरंजी : मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह पक्षश्रेष्ठींनाही अनावश्यक कराव्या लागणाऱ्या उठाठेवीपासून दिलासा मिळाला आहे. तसेच इचलकरंजीतील प्रभाग रचनेत फारसा बदल होणार नाही. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या असून, पुढील वाटचालीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राज्यातील महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचनेच्या निर्णयाकडे राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास अपक्षांची संख्या वाढते. तसेच काही इच्छुक उमेदवारांना ‘मॅनेज’ करावे लागते. हा सर्व खटाटोप करताना पक्षश्रेष्ठींना नाकीनऊ येतात. आता द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्याने इचलकरंजीतील स्थिती मागील पानावरून पुढे अशीच राहील, असे दिसते. त्याचबरोबर नगराध्यक्ष निवड मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांतून होणार असल्याने अनेकांना नगराध्यक्षपदाची संधी देता येणार आहे.
गत निवडणुकीत सन २०१६ ला द्विसदस्यीय प्रभाग रचना व जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी सन २०११ ला चार सदस्यीय प्रभाग रचना आणि नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवड, सन २००६ ला एकसदस्यीय प्रभाग रचना, नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवड, तर सन २००१ ला त्रिसदस्यीय प्रभाग रचना आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली होती. यंदा सन २०११ च्या जनगणनेनुसारच प्रभाग रचना होणार असल्याने त्यामध्ये विशेष बदल होणार नाही. मतदारसंख्या वाढल्याने बूथ व मशीनची संख्या वाढू शकते.