कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरूपतीच्या देवस्थानाशी जोडत त्याच धर्तीवर मंदिराचा विकास करण्याचे नियोजन अत्यंत चुकीचे आहे. ही देवी साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असून, तिचे मूळ स्वरूप आदिशक्तीचे आहे. उलट तिच्या आशीर्वादामुळे तिरूपती-बालाजी या क्षेत्राची निर्मिती झाली. त्यामुळे अन्य देवस्थानांच्या प्रथा, परंपरा सुरू करण्याचा आणि त्याचप्रमाणे विकासाचा अट्टाहास करण्यापेक्षा स्वतंत्रपणे विकास केला पाहिजे. मंदिराचा आराखडा हा केवळ आर्किटेक्चरच्या पद्धतीने बनविण्यात आलेला आहे; पण आर्किटेक्ट म्हणजे मंदिर अभ्यासक नव्हे किंवा मंदिरशास्त्राचा जाणकार नव्हे; त्यामुळे मंदिरासंबंधी कोणताही निर्णय घेताना आधी मंदिररचना आणि मूर्तिशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिराची जागा अनावश्यक गोष्टींनी व्यापून अडचणी निर्माण करायच्या आणि जागा नाही म्हणून ओरड करायची, अशी अवस्था आहे; कारण मंदिराच्या अंतर्गत भागात आणि बाह्ण परिसरात सुधारणांच्या नावाखाली अनेक अनावश्यक बाबी करण्यात आल्या आहेत. ज्यात रथाची जागा, केबिन्स, गरुड मंडपाला ग्रिल, पत्र्याची केबिन्स, फॅब्रिकेशन्स अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. हे सगळे काढून टाकले तर मंदिर प्रशस्त होईल. महाद्वाराबाहेर असलेली सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत व महाद्वारसह नगारखान्याचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे; कारण या परिसराचे बांधकाम गेल्या काही दिवसांत ढासळत आहे. त्याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे. ज्यांनी मंदिराची रचना केली त्यांनी त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. त्यामुळे मूळ मंदिरासह महाद्वार, घाटी दरवाजा हाही दुमजली आहे. येथूनही मंदिराची सुरक्षा करता येते. - उमाकांत राणिंगामंदिर व मूर्तिशास्त्र अभ्यासकमनकर्णिका कुंड खुले करण्यात यावे...मनकर्णिका कुंड खुले करण्यात यावे. स्वच्छतागृहासाठी दक्षिण दरवाजाबाहेरील व विद्यापीठ हायस्कूलच्या मधील जागा योग्य आहे. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यालाही बाधा येणार नाही. जे.पी. नाईक यांचा आराखडा राबवा जे. पी. नाईक यांनी मंदिराच्या चारीही दरवाजांबाहेर मोठे रस्ते असा आराखडा केला होता, तो आजही महापालिकेकडे आहे. त्यानुसार निर्मिती केली जावी. ओवऱ्या विश्रांतीसाठीच...देवस्थानांच्या ठिकाणी असलेल्या ओवऱ्यांना विशेष महत्त्व असते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला प्रसन्न शांततेची अनुभूती मिळावी, देवीच्या दारात काही काळ विश्रांती घेता यावी यासाठी ओवऱ्यांची बांधणी केली जाते. मात्र अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांत दुकाने थाटल्याने दर्शन घेतलेल्या भाविकाला सरळ बाहेरचा रस्ता धरावा लागतो. यामुळे या ओवऱ्या भाविकांसाठी खुल्या करून दुकानदारांचे अन्यत्र पुनर्वसन करावे.
तिरूपतीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिराचा विकास नको
By admin | Updated: June 14, 2016 00:47 IST