इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या सुधारित किमान वेतनाचा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना इचलकरंजीत संप करून येथील वस्त्रोद्योगाला वेठीस धरण्याचे काम कामगार संघटना करीत आहे. हा प्रश्न राज्याचा असतानासुद्धा फक्त येथेच संप करून येथील उद्योग का उद्ध्वस्त केला जात आहे, अशी टीका करणारा प्रश्न पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत उपस्थित करण्यात आला.यंत्रमाग कामगार सुधारित किमान वेतनासाठी लाल बावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. संप काळात शहरातील काही कारखान्यांवर दगडफेकीचे प्रकार घडल्याने दहशत निर्माण झाली आहे. तरी सायझिंग कारखान्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्यावतीने करण्यात आली होती. त्यासंदर्भात पोलीस उपअधीक्षक विनायक नराळे यांनी शहरातील तिन्ही पोलीस ठाणी व सायझिंगधारक प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.बैठकीमध्ये सायझिंगधारकांची बाजू मांडताना बाळ महाराज म्हणाले, सायझिंग उद्योगामध्ये किमान वेतन दिले जात आहे. तरीसुद्धा कामगार संघटनेकडून वारंवार याच उद्योगामध्ये संप घडवून आणला जात आहे. ज्यामुळे सायझिंगधारकांबरोबरच येथील वस्त्रोद्योगाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. प्रकाश गौड म्हणाले, कामगार संघटनेने कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानक संप घडवून आणला. त्यामुळे सायझिंग कारखान्यांमध्ये लाखो रुपयांचे सूत पडून राहिले आहे. कोणतेही कारण नसताना सेक्शन वार्पिंग क्षेत्रात दबाव टाकून संप घडविला जात आहे. कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी कामगार व सायझिंग कारखान्यांना पोलीस संरक्षण मिळावे. यावेळी वसंतराव पाटील, दिलीप ढोकळे, आदींनीही काही मुद्दे मांडले. बैठकीच्या शेवटी आंदोलन काळात दोन्ही बाजूंकडून शांतता राखली पाहिजे. चर्चेने हा विषय संपवावा, असे आवाहन करून उपअधीक्षक नराळे यांनी सर्वांना पोलीस संरक्षणाचे आश्वासन दिले आणि बैठक संपुष्टात आली. (प्रतिनिधी)
संपामुळे वस्त्रोद्योग उद्ध्वस्त
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST