कोल्हापूर : शहरात ज्यांनी पाणीपुरवठ्याची विनापरवाना कनेक्शन्स घेतली आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सर्जेराव पाटील होते. शहरातील विनापरवाना पाण्याची कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून पाणीचोरांची शोध मोहीम हाती घ्यावी. ज्यांनी अशी कनेक्शन्स घेतली आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ज्यांच्या मेहरबानीने अशी कनेक्शन सुरू आहेत, अशा मीटर रिडर्सवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी संभाजी जाधव यांनी सभेत केली. गणेशोत्सव लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत. इराणी खणीत पाणीपातळी कमी झाली असून, खणीत नव्याने पाणी सोडण्याची कार्यवाही व्हावी, अशा सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. इराणी खणीत रंकाळा तलावातील पाणी सोडून ती भरून घेण्यात येणार आहे. त्याशिवाय मोहिते खण, कदम खण व इतर खणीत गणेश विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
विनापरवाना नळधारकांवर कारवाई करा
By admin | Updated: August 22, 2015 00:53 IST