गुंठाभरही जमीन नसल्याने परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी किराणा दुकानाचा व्यवसायात जम बसविला, तसेच जोडधंदा म्हणून वृत्तपत्र विक्रीलाही प्राधान्य दिले. अंकाच्या गैरसोयीबाबत ते थेट वृत्तपत्र मालकांशी संवाद साधून अडचणी दूर करत.
२००५ पूर्वी लोकमतचे अंक सांगलीतून येत होते. ते निपाणीतून एसटीतून खडकेवाडा येथे येत. तेथून सायकलवरून चिखलीत आणून लोकांपर्यंत पोहोचवत असत. ५अंकापासून आता ३५० अंकाची ते विक्री करतात. गेल्या वर्षभरापासून ते शरीर स्वास्थ्यामुळे अस्वस्थ होते; पण कोणाचीही गैरसोय होऊ नये. प्रत्येक वाचकांपर्यंत अंक पोहोचला पाहिजे, याची आदबीने काळजी घेत होते. लोकांशी संवाद साधण्याबाबत ते आपला मुलगा अभिजीत कोरडे याला मार्गदर्शन करत. सध्या, आण्णा यांच्याप्रमाणेच अभिजीत हा अंकविक्रीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे.
५७ वर्षात नातेवाइकांकडे एकही वस्ती नाही
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे विहिरीत अंघोळ करून लोकांना अंक पोहच करण्यासाठी ते सज्ज होत. लोकांची गैरसोय होईल, याची ते दक्षता घेत. त्यामुळे त्यांनी कधीही पै-पाहुण्यांकडे वस्ती केलेली नाही. एखाद्यावेळी ग्राहकांकडे पैसे नसले तरीही ते ‘पेपर घ्या. वाचा. पैसे येतील त्यावेळी द्या’, असे म्हणत असल्याचेही अनेक वाचकांनी सांगितले.