पळशी : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने झोडपून काढलेले असतानाच माण तालुक्याला मात्र सवतीची वागणूक मिळाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जनावारांचा चारा महागला आहे. यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.माण तालुक्यात पावसाने ओड दिल्याने पळशी, मार्डी परिसरातील शेतकऱ्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यातच परिसरात कडब्याचा दर १८०० ते २००० रुपये प्रती शेकडा आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कडबा घेणे परवडत नाही. त्यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या जनावरांना सांभाळणे जिकरीचे झाले आहे. परिसरात उसाची विक्री वाढलेली असून, ऊस विक्रेते मोरोची, पिंपरी, ता. माळशिरस परिसरातून ऊस विकण्यासाठी आणत आहेत. हाच ऊस शेतकरी २६०० ते २७०० रुपये टन दराने घेत आहेत. उसाची एक मोळी ६० रुपयांना आहे. त्यामध्ये साधारणपणे २०-२२ ऊस असतात. त्यामुळे चारा समस्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. (वार्ताहर)पाण्याचा प्रश्न गहनपाऊस नसल्याने चारा महागला असून, जनावरांसाठी तो घेणेही अवघड झाले आहे. त्यातच वैरणीचे दर भडकल्याने आम्ही ऊस विकत घेत असतो. भविष्यात पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या व चाऱ्याची समस्या भेडसावू शकते, अशी भिती पळशी येथील शेतकरी विजय माळवे यांनी व्यक्त केली.
ऊस महागला; कडबा कडाडला!
By admin | Updated: August 3, 2014 22:42 IST