कोल्हापूर महानगरपालिकेच्या ठेकेदारांच्या ग्रुपवर बुधवारी एका सदस्याने मेसेज टाकला आहे. ‘एका पक्षाने आणलेल्या निधीतून ज्यांना कामे मिळालीत त्यांनी, कामे घेताना जे ठरले आहे ते दोन दिवसात पूर्ण करावे, जो लवकर पूर्ण करील त्याला पुढील कामे मिळतील. जास्त लांबन लावायचे नाही’, असे हस्तलिखीत पत्र टाकले आहे. ग्रुपवर झालेल्या संवादात काही जणांनी सहमती दर्शविली आहे. काहींनी ओके म्हटले आहे तर एकाने रडणारी इमेज टाकली आहे. एकाने चक्क ‘म्हणजे परत अठरा टक्के’ असा उल्लेख केला आहे.
राज्य शासन वा महानगरपालिकेकडे जमा होणारा निधी सामान्य करदात्याच्या पैशातून आलेला असतो. या पैशाचा योग्य व भ्रष्टाचारमुक्त विनियोग करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची असते. सध्या महानगरपालिका विसर्जित असून, महानगरपालिकेचा कार्यभार प्रशासक यांच्याकडे आहे. त्यामुळे या मेसेजमधून अनेक अर्थ विदीत होत आहेत. सामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणाऱ्या या भ्रष्टाचारामुळे कोणाची घरे भरली जाणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
सुमारे १२ कोटींचा निधी आणला, असा दावा होत असताना त्याचे १८ टक्के म्हणजे सुमारे सव्वा कोटी रुपये इतका पैसा ठेकेदारांकडून कोण काढून घेत आहे ते समजावे. म्हणूनच या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून जे यात गुंतलेले असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, राजू मोरे, दिलीप मैत्रीणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, अजित सूर्यवंशी यांनी दिले.