मुरगूड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेले अनेक दिवस बंद असणाऱ्या बहुतांश शाळा सुरू झाल्या खऱ्या, पण तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा सुरू नसल्याने शाळेपर्यंत जायचे कसे, या गर्तेत विद्यार्थी आणि पालक सापडले आहेत.
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला तरी बरेच विद्यार्थी अजून घरीच आहेत. त्यामुळे एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावा-गावांत शाळा आहेत. पण माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर दूर शहरातील किंवा परिसरातील मोठ्या गावांत जावे लागते. यासाठी विद्यार्थी सुरक्षित आणि सवलतीची म्हणून शासनाच्या एसटी सेवेचा लाभ घेतात. तसेच पाचवी ते बारावीपर्यंत शासनाने सावित्रीबाई फुले मोफत पास योजना मुलींसाठी लागू केली आहे. मुलांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जातो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने सर्वच शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच गावांत, शहरात शाळा सुरू केल्या आहेत. पण अजून बऱ्याच ठिकाणी एसटी बस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे. गावापासून लांब असणाऱ्या शाळेत जायचे कसे, हा प्रश्न भेडसावत आहे. एसटी बस सुरू नसल्याने काही पालक आपल्या पाल्याला सोडण्यासाठी जात आहेत, तर काही ठिकाणी खासगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुले शाळेत येत आहेत. त्यामुळे कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील सर्वच शाळांनी एसटी सेवा सुरू करा, अशी मागणी गारगोटी व कागल एसटी डेपोकडे केली आहे. गाड्या सुरू केल्यानंतर प्रवासी बसत नाहीत, अशी तक्रार कर्मचारी करतात. मग तोट्यात गाड्या सुरू करायच्या का, असा सवाल एसटीचे स्थानिक अधिकारी करत आहेत. एसटी बस सुरू होण्यास अनेक अडथळे असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान का? असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.