कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर कर्नाटक, गोवाकडे जाणाऱ्या कोल्हापूर विभागातील एस.टी.बसेस सुरू झाल्या. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर त्या अजूनही बंदच आहेत. कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकसह गोवा शासनाकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संर्पक साधून या मार्गावरील बसेस सुरू करण्याची विनंती केली होती. ती विनंती या दोन्ही सरकारनी धुडकावली. त्यामुळे या मार्गावरील बसेस अजूनही बंद आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काहीअंशी निपाणी, संकेश्वर, बेळगाव, हुबळी, धारवाड या कर्नाटकातील मार्गावर एस.टी.महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या. प्रवाशांचा प्रतिसादही चांगला लाभला. मात्र, पुन्हा दुसरी लाट आली. त्यामुळे कर्नाटक सरकारने प्रथम आरटीपीसीआर चाचणी केलेल्या प्रवाशांनाच प्रवेश देण्याची अट घातली. त्यामुळे महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने या मार्गावरील बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद असतानाही नाइलाजावास्तव वाहतूक बंद केली. अद्यापही हाच निर्णय कर्नाटक सरकारने सुरूच ठेवला. त्यामुळे या मार्गावरील बसेस अजूनही बंद आहेत.
अशाच पद्धतीने गोवा राज्यातही बसेसना वाहतूक करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील प्रशासनाशी पत्रव्यवहार व वैयक्तिक गाठीभेटी घेऊन चर्चा केली. मात्र, तेथील संबंधित विभागाने राज्य सरकारचा अध्यादेश नसल्याने वाहतुकीस परवानगी नाकारली. त्यामुळे एस.टी. बसेस केवळ या दोन्ही राज्यांच्या सीमेपर्यंतच जातात.
कोरोनापूर्वी परराज्यात जाणाऱ्या बसेस
कोल्हापूर -बेळगाव
कोल्हापूर-पणजी
कोल्हापूर-हुबळी
कोल्हापूर - निपाणी
कोल्हापूर-मडगाव
कोरोनापूर्वी बेळगावसह पणजी मार्गावर सर्वाधिक गर्दी
कोरोना संसर्गापूर्वी एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून कर्नाटक (बेळगाव) या मार्गावर ११५ बसेस रोज मार्गस्थ होत असत. तर (पणजी) गोव्याकडे ३५ बसेस रोज मार्गस्थ होत असत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली.
पहिले पूर्णत्वाकडे, तर दुसरे ८५ टक्के लसीकरण
कोल्हापूर विभागाकडे चालक (१४५०), तर वाहक (१४२५) आहेत. यातील सर्वच चालक-वाहकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहेत. तर दुसरा डोस ८५ टक्के पूर्ण झाला आहे.
कोट
दोन्ही डोस घेतलेल्याच चालक-वाहकांना कर्नाटक, गोवा आदी राज्यांवरील मार्गावर कर्तव्यासाठी पाठविले जाते. मात्र, सध्या दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून कोल्हापुरातून एस.टी.बसेस सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. याबाबतचे अध्यादेश तेथील सरकारने काढलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या तरी बंद आहे.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. महामंडळ, कोल्हापूर विभाग