कोल्हापूर : जात नष्ट करण्यासाठी पुरोगामी, मानवतावादींनी पुढे यावे. शिवाय त्यांनी आंतरजातीय विवाहाला बळ द्यावे, असे आवाहन सेझविरोधी आंदोलनाच्या प्रवक्त्या व सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सोमवारी येथे केले.येथील शहीद कॉ. गोविंद पानसरे विचार मंचतर्फे आयोजित आॅनर किलिंग विरोधी जनजागृती परिषदेत त्या बोलत होत्या. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे शहर सचिव अनिल चव्हाण, तर जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे, वर्ल्ड फेडरेशन आॅफ यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे प्रमुख उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, जातीच्या नावावर संघटना चालविणाऱ्यांना परंपरा, चालीरीती मान्य आहे की, संविधान व राजर्षी शाहू महाराज मान्य आहेत, याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. इंद्रजित व मेघा यांच्या खुनानंतर या सर्व संघटना शांत बसल्या. हे प्रतिगाम्यांच्या पथ्यावर पडणारे कृत्य आहे. या सर्व गोष्टींमागे पितृसत्ताक व्यवस्था हे मूळ कारण आहे. आजची तरुणाई नव्या वाटा शोधत आहे. अशावेळी जातीवर माणूस चांगला अथवा वाईट ठरविणे हे वाईट आहे. जातिअंत, आंतरजातीय विवाहातील अडचणी दूर केल्या पाहिजेत.प्रदीप देशपांडे म्हणाले, २१व्या शतकामध्ये देश महासत्ता बनविण्याची भाषा करताना जात, धर्म, अंधश्रद्धा, आदींपेक्षा व्यक्तीतील गुण महत्त्वाचे आहेत. विचारांमध्ये प्रगती होणे आवश्यक आहे. एक सज्ञान मुलगा, मुलगी स्वइच्छेने विवाहासाठी एकमेकांची निवड करत असतील, तर त्याला आपण पाठबळ दिले पाहिजे. समाजाने त्यांना स्वीकारले पाहिजे. समाजोपयोगी पुरोगामी विचारधारांना पोलीस दलाकडून सहकार्य केले जाईल.गिरीश फोंडे म्हणाले, संत बसवेश्वर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, आदींनी जातिअंतासाठी प्रयत्न करताना विवाह याचा साधन म्हणून वापर केला. त्यामुळे जाती उद्धारामध्येच धन्यता मानणाऱ्या संघटनांनी जातिअंताकडे वाटचाल करणे गरजेचे आहे.अनिल चव्हाण म्हणाले, आंतरजातीय विवाहाप्रमाणे आंतरधर्मीय व आंतरप्रांतीय विवाह झाले तरच, समाज व राष्ट्रीय ऐक्य वाढणार आहे.कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते आकाश कांबळे व सोनाली कल्याणकर यांचा आंतरजातीय विवाह लावण्यात आला. सत्यशोधक मंगलाष्टका व प्रतिज्ञा घेऊन, फुले टाकून विवाह करण्यात आला. यावेळी रघुनाथ कुलकर्णी, दिलदार मुजावर, सुनील जाधव, बी. एल. बर्गे, स्वाती क्षीरसागर, के. डी. खुर्द, महादेव आवटे, शर्वरी मेटके, मुकुंद कदम, आदी उपस्थित होते. शहीद गोविंद पानसरे विचार मंचचे निमंत्रक सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकातून केवळ बोलके सुधारक बनण्यापेक्षा कर्ते सुधारक व्हावे, असे आवाहन केले. किरण मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचा सत्कारआंतरजातीय विवाह करणाऱ्या अमोल व प्रीतम देवडकर, विनोद व ज्योती बनसोडे, युवराज व अमृता कवाळे, संतोष व श्रृती बनसोडे, सूरज व भाग्यश्री कवाळे, इम्रान व वृषाली शेख यांच्यासह आंतरजातीय विवाहांना साहाय्य करणाऱ्या मनीषा व लक्ष्मण बुचडे यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.परिषदेतील ठराव ...आंतरजातीय विवाहांना शासनाने तीन लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.आंतरधर्मीय विवाहांनादेखील आर्थिक साहाय्य मिळावे.आंतरजातीय विवाहाला साहाय्य करण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय हेल्पलाईन सुरू करावी.विवाहापूर्वी वैद्यकीय चाचणी शासनाने अनिवार्य करावी.आंतरजातीय विवाहांना मागूनदेखील पोलीस संरक्षण न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
आंतरजातीय विवाहाला बळ द्यावे
By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST