उदगाव : महिनाभरात सांगली- कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. लोकांचे बळी जाण्याला सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार संयुक्तरीत्या जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत व तात्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी सर्वपक्षीय समितीने दानोळी फाटा येथे गुरुवारी एक तास रस्ता रोको केला.
यावेळी महामार्गावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक व सर्व अपुरी कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्ही महामार्गावरून उठणार नाहीत, अशी भूमिका घेतल्यानंतर उपअभियंता बागवान यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सर्वपक्षीय कृती समितीने दानोळी, जैनापूर, उदगाव परिसरातील नागरिकांसह सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, यासाठी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास बायपास महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन केले.
यावेळी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रामचंद्र शिंदे, शैलेश आडके, सुकुमार सकाप्पा यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ठेकेदाराने ओढ्याच्या ठिकाणी सुरक्षा पाइप, साइड पट्टीत मुरूम, सुरक्षा लाइट, फलक यासह सुविधा देणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी मिलिंद साखरपे, अभी माणगावे, अमित दळवी, उमेश केकले, नीळकंठ राजमाने, अरुण पाटील, नामदेव भिसे, राजेंद्र पिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १८०२२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - सांगली- कोल्हापूर महामार्गावर गुरुवारी सर्वपक्षीयांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.