कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका सहन करत असलेल्या नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत देऊ केली आहे. पण, हे निर्देश डावलून जिल्ह्यातील फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. या मनमानी कारभारावर प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी शिवसेनेने सोमवारी केली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार कर्जाचा हप्ता भरण्यास मुभा दिली असताना फायनान्स कंपन्यांकडून मात्र दबाव आणला जात आहे. वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याकडे कंपनीचे ओळखपत्र नसणे, कर्जदारांना फोन करणे, घरी जाऊन धमकावण्याचे ही प्रकार घडत आहेत. नियमबाह्य आणि गुंडगिरीने होणारी ही वसुली अत्यंत गंभीर असून, फायनान्स कंपन्याच्या मनमानी कारभारात वाढ होत आहे. हप्ता न भरल्यास तब्बल २४ ते ४८ टक्के व्याज आकारण्याची धमकी देऊन बळजबरीने वसुली केली जात आहे. तरी संबंधितांवर कडक कारवाई करावी. यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सुनील जाधव, किशोर घाटगे, विभागप्रमुख राजू काझी, युवा सेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते उपस्थित होते.
---
फोटो नं १२०४२०२१-कोल-शिवसेना निवेदन
ओळ : सक्तीने कर्जाची वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.
--