श्रीकांत ऱ्हायकर -- धामोड --खामकरवाडी लघुपाटबंधारे तलावामध्ये पाणीसाठा करावयास सुरुवात केल्यापासून तब्बल बारा वर्षांनंतर प्रथमच तलावाने तळ गाठला आहे. सध्या या तलावातील उर्वरित पाणीसाठ्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकर भरणारा व लवकर कोरडा पडणारा, अशी ख्याती मिळविलेल्या या तलावाचे खरे स्वरूप आता लक्षात आले असून, या तलावाच्या बुडीत पाणीसाठ्यातच खुदाई केलेल्या दगडांच्या प्रचंड मोठ्या खाणी दिसत असून, हा दगड बाहेर न टाकल्यानेच याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. त्यामुळे अवचितवाडी व खामकरवाडी येथील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.२००१-२००२ रोजी खामकरवाडी-अवचितवाडी दरम्यान खडकीच्या ओढ्यावर ११६२.७८ सहस्र घनमीटर इतकी पाणी साठवण करणाऱ्या तलावाची बांधणी करण्यात आली. मात्र, या तलावाची बांधणी करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सुरुवातीपासूनच हा तलाव अडथळ््यांची शर्यत पार करीत आला. चालू वर्षी उन्हाळ््याची तीव्रता प्रचंड वाढल्याने तलावातील पाणी पातळी पूर्णत: कमी झाली. आता हा तलाव पूर्णत: कोरडा पडला असून, या तलावातील शिल्लक पाणीसाठ्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या तलावाच्या खुदाईवेळी व अस्तरीकरणासाठी बुडीत पाणीसाठ्यात खणी मारून उकरलेला दगड तलावाच्या मृत पाणीसाठ्यातच प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवल्याने व काम पूर्णत्वास आल्यानंतरही तो बाहेर न काढल्याने पाणीसाठ्यावर याचा गंभीर परिणाम होत असून, ११६२.७८ सहस्र घनमीटर इतक्या पाणी साठवण क्षमतेच्या तलावात प्रत्यक्षात कमीच पाणी साठत आहे. बहुतांश दगडांच्या मोठमोठ्या खणी व त्यातील दगड हा मुख्य दरवाजाच्या जवळच धरणातच बुडीत क्षेत्रातच टाकला गेल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. प्रत्यक्षात ११६२.७८ सहस्र घनमीटर क्षमतेच्या पाणीसाठ्याच्या तलावात सध्या १००० सहस्र घनमीटरचे पाणी साठत असल्याचे निदर्शनास येत आहे.
खामकरवाडी तलावात दगडांचे ढिगारे
By admin | Updated: June 13, 2016 00:13 IST