लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी:
नागणवाडी, ता. भूदरगड येथील पुनर्वसन व निधीअभावी गेल्या वीस वर्षांपासून रखडलेल्या नागणवाडी (बारवे-दिंडेवाडी) प्रकल्पातील २२ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी ३ कोटी २४ लाख रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भूदरगड व कागल या दोन तालुक्यांतील सुमारे तीस गावांना वरदान ठरणाऱ्या नागणवाडी (बारवे-दिंडेवाडी) प्रकल्पाचे काम लाभक्षेत्रामध्ये जमिनी उपलब्ध नसल्याने व निधीअभावी रखडलेले होते. यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पास ७२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त करून याकरिता निधी उपलब्ध केला आहे. त्याच बरोबर प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्प ग्रस्तांना जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करून हेक्टरी २७ ते ३० लाख रुपये मंजूर करून आणले. यामधील प्रकल्पग्रस्तांना पॅकेजचे वाटपही सुरू आहे. परंतु उर्वरित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करून उर्वरित पात्र कुटुंबाना जमिनीऐवजी विशेष आर्थिक देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामातील प्रमुख अडथळा असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आजअखेर ७ टप्प्यामध्ये १२२ प्रकल्पग्रस्तांना १७ कोटी १२ लाख इतक्या रकमेचे विशेष आर्थिक पॅकेज वाटप करण्यात आले आहे. ८ व्या टप्प्यातील २२ प्रकल्पग्रस्तांमधील १६ प्रकल्पग्रस्तांच्या बँक खातेवर २ कोटी २९ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित ६ शेकऱ्यांना ९७ लाख २० हजार येत्या काही दिवसांत जमा होणार आहेत. यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबरोबर प्रकल्पाचे काम गतीने सुरू करून लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यासाठी दिंडेवाडीचे सरपंच श्रीधर भोईटे, बारवे सरंपच योगेश पाटील, सुनील किरोळकर, शहाजी वारके, सुरेश पाटील, राजू भारमल, सुरेश पाटील. अशोक चव्हाण, शिवाजी पाटील, ॲड.मोहन पाटील, हिंदूराव चव्हाण यांच्यासह सर्व समितीचे प्रमुख कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले.
फोटो : आमदार प्रकाश आबिटकर यांचा लावणे.