कोल्हापूर : टोेलविरोधी घोषणांचा अखंड गजर, हालगी व झांजपथकाचा दणदणाट, गळ्यात पक्षांचे स्कार्फ व हातात झेंडा घेतलेले कार्यकर्ते, अशा जल्लोषी वातावरणात आज, सोमवारी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून ‘टोल देणार नाहीच’, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. ‘टोल’च्या निषेधार्थ निघालेल्या तिसऱ्या महामोर्चात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवून टोलधाडीचा निषेध केला. गेली दोन वर्षे आंदोलन सुरू असताना, या प्रश्नाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल, तर आम्हालाही चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजूनही ही मंडळी शुद्धीवर येत नसतील, तर अशा मुजोर राज्यकर्त्यांना जनतेची ताकद दाखवा, असे आवाहन करत या निष्क्रिय सरकारचे दिवस भरले आहेत, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. कोल्हापूरला सत्ताधाऱ्यांनी नेहमीच सापत्नतेची वागणूक दिली आहे. त्यामुळे हा टोलचा प्रश्न नाहीच, टोल गेला खड्ड्यात.. हा राजर्षि शाहूंच्या अस्मितेचा लढा आहे, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील या मंत्र्यांचे कार्यकर्ते या मोर्चात सगळ्यात पुढे होते. त्यामुळे आतापर्यंत फक्त विरोधकच मोर्चे काढत होते आता मंत्रीही रस्त्यावर उतरल्याचे चित्र त्यामुळे दिसले. टोल पुन्हा सुरू कराल तर याद राखा. टोल तर देणार नाहीच, टोलं मात्र जरूर देऊ, असा इशाराच महामोर्चाद्वारे देण्यात आला. मोर्चात पूर्वीप्रमाणेच पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच राजकीय कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले. शहराच्या मुख्य मार्गांवरून दीड तास चाललेल्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मोठया बंदोबस्तामुळे रस्त्यांना पोलीस छावणीचे स्वरूप आले. सकाळपासून बंद असलेले सर्व व्यवहार दुपारनंतर सुरळीत झाले. रिक्षा व केएमटी बस वाहतूक तीन वाजल्यानंतर पूर्ववत सुरू झाली. कोल्हापूर बार असोसिएशनने दुपारपर्यंत काम बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला. वकील काळा कोट घालून मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, दुपारी पाऊणच्या सुमारास गांधी मैदानातून महामोर्चाला प्रचंड जल्लोषात सुरुवात झाली. वाद्यांच्या आणि घोषणांच्या आवाजांनी परिसर दुमदुमला. कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ वाहनेही मोर्चात सहभागी झाली. गांधी मैदान, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, दसरा चौक, स्टेशन रोड, बसंत बहार टॉकिजमार्गे मोर्चा दुपारी सव्वादोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या दरम्यान मोर्चाच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. प्रमुख नेत्यांची भाषणे झाल्यावर जिल्हाधिकारी राजाराम माने व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. शहरात टोलवसुली सुरू केल्यास टोलनाक्यांवर मारामारी, झगडा होणार नाही. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याची सक्त ताकीद ‘आयआरबी’ला देण्यात येईल. पोलीस हे टोलवसुलीचे काम करणार नाहीत, तर तेथे बाजूला थांबून केवळ कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हस्तक्षेप करतील, असे पोलीस अधीक्षक शर्मा यांनी शिष्टमंडळास सांगितले. महामोर्चात महापौर सुनीता राऊत, श्रीमंत शाहू छत्रपती, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, आ. चंद्रदीप नरके, चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, उपमहापौर मोहन गोंजारे, माजी आ. मालोजीराजे, संपतराव पवार-पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील, नाविद मुश्रीफ, कॉँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, दिनकर जाधव, आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
पुन्हा घुमला ‘टोल देणार नाही’चा नारा
By admin | Updated: June 10, 2014 02:09 IST