कोल्हापूर : ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याचा गैरवापर करणाऱ्या दलित उमेदवारांना राजकीय पक्षांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असा निर्णय बुधवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात घेण्यात आला. तरीही कोणत्या पक्षाने अशा लोकांना उमेदवारी दिल्यास त्यांना मराठा समाज धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती अॅड. बाबा इंदूलकर, प्रा. जयंत पाटील, अजित राऊत, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, दिलीप पाटील, जयेश कदम, अशोक देसाई, डॉ. अभय कोटकर, संजय साळोखे, सचिन तोडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. जयंत पाटील म्हणाले, वैयक्तिक द्वेष, टोकाची राजकीय इर्ष्या, स्थानिक राजकारण अशा अनेक कारणांसाठी बहुतेक वेळा अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो, तसेच त्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे अशा खोट्या गुन्ह्णांत अडकलेल्या आरोपीस व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याला कुठे तरी पायबंद बसावा यासाठी सकल मराठा समाजातर्फे सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्या दलित उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना राजमान्यता मिळवून देऊ नये, तरीही दिल्यास याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. मराठा समाजाने अशा राजकीय पक्षांना या निवडणुकीत धडा शिकवावा.बाबा इंदूलकर म्हणाले, राज्यात दाखल होत असलेल्या एकूण गुन्ह्णांच्या तुलनेत अॅट्रॉसिटीचे प्रमाण हे ३० टक्के आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. याचा निकाल लागून अनेकजण निर्दोष सुटतात; परंतु दरम्यानच्या काळात त्याच्यासह कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आम्ही अशा पद्धतीने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला आहे.दिलीप देसाई म्हणाले, राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे इतर कायद्यांमध्ये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई होते, परंतु अॅट्रॉसिटीमध्ये ती होत नाही. त्याचा त्रास मराठा समाजाला होत आहे. निवडणुकीत चारित्र्यवान दलित बांधवांना आम्ही मतदान करू पण गैरवापर करणाऱ्यांना विरोध केला जाईल.मुळीक म्हणाले, आतापर्यंत सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ न प्रयत्न केला आहे; परंतु तरीही असे प्रकार सुरू असल्याने आम्हाला या निर्णयापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नक्कीच गैरवापराला शह बसेल. यावेळी उमेश पोवार, अवधूत पाटील, उदय लाड, संदीप पाटील, संजय काटकर, स्वप्निल पार्टे आदी उपस्थित होते.सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची भेट घेणार सकल मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यांना भेटणार असल्याचे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले.
‘अॅट्रॉसिटी’चा गैरवापर करणाऱ्यांना वगळा
By admin | Updated: January 19, 2017 00:37 IST