कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांच्या तणावानंतर शनिवारपासून करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली. औरंगाबादहून आलेल्या पुरातत्त्व खात्याच्या सात तज्ज्ञांच्या पथकाकडून पहिल्या दिवशी मूर्तीच्या सद्य:स्थितीची छायाचित्रे, मोजमाप, रेखाटने यांच्या नोंदी करण्यात आल्या. सप्तश्रुती पठणाचे धीरगंभीर स्वर, उच्चस्वरातील श्रीसूक्त पठण, तज्ज्ञ पथक आल्यामुळे वाढलेला उत्साह यांमुळे शनिवारच्या चौथ्या दिवशी मंदिरात आध्यात्मिक आनंदाचा भाविकांनी अनुभव घेतला. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ‘पुरातत्त्व’चे अधिकारी मनेजर सिंग यांच्यासह विनोदकुमार, सुधीर वाघ, नीलेश महाजन, मनोहर सोनवणे व दोन कलाकार या सहकाऱ्यांनी मंदिरात प्रवेश केला. आठवडेकरी श्रीपूजक मयूर मुनीश्वर यांनी संकल्पोक्त साहित्याचे पूजन केले. त्यानंतर अधिकाऱ्यांना सुपारी देऊन संवर्धनासाठी मूर्ती त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी देवस्थान समितीचे संगीता खाडे, साळवी, हवालदार यांच्यासह श्रीपूजक, आदी उपस्थित होते यज्ञमंडपामध्ये सहस्रचंडी, महाअनुष्ठानाचा व लक्ष श्रीसूक्त पठणाचा दुसरा दिवस होता. सलग साडेसहा तास पाठवाचन झाले. तसेच श्री शाहू वैदिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रीसूक्त पठण केले. यावेळी या पठणामध्ये पंकज दादर्णे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता. याबरोबरच श्री महाकाली विधान व सहस्रकनकार्चन हे विधी पार पडले. त्रिगुणात्मिका श्री अंबाबाईच्या एका स्वरूपाचे म्हणजेच श्री महाकालीचे विधान ऋतुजा मुनीश्वर व मनोज मुनीश्वर यांच्या यजमानपदाखाली पार पडले. ‘श्री करवीरमाहात्म्य’ या स्थानमहत्त्व सांगणाऱ्या प्राचीन ग्रंथाचे तसेच श्री दत्तात्रय गुरूंच्या जीवनलीलांचे सार असणाऱ्या ‘श्रीगुरुचरित्रा’च्या सप्ताह पारायणाचा प्रारंभ करण्यात आला. ‘करवीरमाहात्म्या’साठी प्रसन्न मालेकर व ‘गुरुचरित्रा’साठी नरसोबावाडीचे जमदग्नी गुरुजी यांनी पारायणास सुरुवात केली. संध्याकाळी गरुड मंडपात घोडजकर गुरुजी यांच्या सुश्राव्य देवी भागवत निरूपणात भाविक तल्लीन झाले. आज, रविवारी सकाळी महासरस्वती विधान होणार असून, शनिवारी रात्री संगीतसेवेसाठी शिवराज पाटील यांनी भावगीत व भक्तिगीत सेवा केली. विश्व हिंदू परिषदेचा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाला पाठिंबा अंबाबाईच्या मूर्तीवर करण्यात येत असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा असल्याचे कार्याध्यक्ष बाळ महाराज यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. ते म्हणाले, ‘प्रतिष्ठामयुख’ तसेच ‘साधना दीपिका’ या ग्रंथांमध्ये स्वयंभू व ऋषिमुनींद्वारे सिद्ध असलेली मूर्ती बदलण्याची गरज नसते. अंबाबाईची मूर्ती ही अनादी व सिद्धमूर्ती आहे. कोट्यवधी भक्तांच्या भावना या मूर्तीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करून तिचे संवर्धन करणे हा एकमेव उपाय आहे. या प्रक्रियेच्या विधीत शंकराचार्यांसह विविध शास्त्रपंडित विद्वानांचा सहभाग आहे. त्यामुळे श्री मूर्तीवर केली जाणारी प्रक्रिया ही अधार्मिक आहे, असे म्हणून त्याला विरोध करणे हे बालिशपणाचे आहे. अंबाबाईच्या मूर्तीसंदर्भात कोणताही ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना केल्याचे पुरावे आहेत. पुन:प्रतिष्ठापना झाली यावरून मूर्तीचे प्राचीनत्व सिद्ध होते. परिषदेस शिवानंद स्वामी, शिवजी व्यास, बजरंग दलाचे बंडा साळोखे, महेश उरसाल उपस्थित होते.
अंबाबाई मूर्ती संवर्धनाचा श्रीगणेशा
By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST