कोल्हापूर : दाेन प्रभागांच्या सीमारेषेवर एखादा रस्ता असेल आणि तो मोठ्या रहदारीचा असेल, तर त्याची ‘वाट’ कशी लागते, हे पाहायचे असेल, तर तुम्हाला शिवाजी पेठेत जावे लागेल. शिवाजी पेठेतील प्रमुख रस्ता असलेल्या बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता अक्षरश: खड्ड्यात हरविला आहे. गेल्या काही महिन्यांत शहरात रस्त्यांवर ३० ते ४० कोटी खर्च करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे अक्षरश: दुर्लक्ष झाले आहे.
शिवाजी पेठ म्हणजे अनेक चळवळीचे उगमस्थान मानले जाते. अन्यायाविरुद्ध संघर्ष हा या पेठेचा बाणा आहे; परंतु गेल्या एक ते दीड वर्षापासून याच पेठेतील बिनखांबी गणेश मंदिर ते उभा मारुती चौक हा प्रमुख रस्ता अत्यंत खराब झाला आहे. बनखांबी ते निवृत्ती चौक या रस्त्यावर एक ते दोन फूट लांबीचे आणि तीन ते चार इंच खोलीचे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांची हाडे खिळखिळी करणारे खड्डे अपघातलाही आमंत्रण देणारे ठरले आहेत.
निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता खड्ड्यांनी तर भरला आहेच, शिवाय बऱ्याच ठिकाणी त्याचे अस्तित्वही नष्ट झाले आहे. येथे रस्ता होता यावर कोणाचा विश्वासदेखील बसणार नाही, इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर महानगरपालिकेचे गांधी मैदान विभागीय कार्यालय क्रमांक- १ असून, कार्यालयात उपशहर अभियंता बसतात; पण ते कार्यालयात कोठून येतात व कोठून जातात समजत नाही. कारण त्यांनाही या रस्त्याची दयनीय अवस्था दिसलेली नाही.
रस्त्याची दक्षिण बाजू ही फिरंगाई प्रभागात, तर उत्तर बाजू तटाकडील तालीम प्रभागात येते. या दोन प्रभागांच्या सीमेवरच रस्ता आहे. जेथे प्रभागाच्या सीमेवर रस्ते असतात तेथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यात शिवाजी पेठेचा रस्ता म्हणजे उत्तम नमुना आहे. तीन वर्षांपूर्वी हा रस्ता केला होता म्हणून या वर्षात धरलेला नसल्याचे एका माजी नगरसेवकांनी सांगितले.
उभा मारुती अंधारात
उभा मारुती चौकात हायमास्ट दिवे लावण्यात आले होते; परंतू २०२० मध्ये शिवजयंतीवेळी ते काढण्यात आले. त्यानंतर हे दिवे लावले गेले नाहीत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा हा चौक रात्री अंधरात असतो.
फोटो क्रमांक - ०३०४२०२१-कोल-शिवाजी पेठ/ शिवाजी पेठ ०१
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते बिनखांबी गणेश मंदिर हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)