इचलकरंजी : शहरातील गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहापूर येथील खणीमध्ये नगरपालिकेच्या वतीने सोय करण्यात आली आहे. परंतु या खणीमध्ये गटारीचे पाणी थेट मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने गोंधळ उडाला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने ‘श्रीं’ची मूर्ती वाहत्या पाण्यात, तर नगरपालिकेने शहापूर खणीत विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज, मंगळवारी नागरिक काय करणार, असा पेच निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या आवाहनानुसार नगरपालिकेने पंचगंगा नदी प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नदीमध्ये न करता शहापूर खणीत करण्यासाठी नियोजन केले. त्यासाठी वीस लाख रुपये खर्च करून खणीतील जलपर्णी काढण्याचा ठेका दिला. परंतु खणीमध्ये अद्यापही काही प्रमाणात जलपर्णी आहे. त्यातच सार्वजनिक गटारीचे सांडपाणी थेट या खणीमध्ये मिसळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या भावना तीव्र झाल्या असून, जाणीवपूर्वक गटारीचे पाणी मिसळत असलेल्या खणीमध्ये विसर्जन कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, नगरपालिकेने विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी ३० कृत्रिम विसर्जन कुंडांची सोय केली आहे. परंतु विश्व हिंदू परिषदेने हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी वाहत्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे. आता यावर नागरिक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.